येत्या काही महिन्यात होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलढवून लावत सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत आपल्या महापौर बसवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. दरम्यान, या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला १०० हून अधिक जागांवर विजय मिळू शकतो, असा दावा पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमधून करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आक्रमकपणे लढण्याची तयारी केलेल्या भाजपाकडून विविध माध्यमातून मुंबईतील जनमताचा अंदाज घेतला जात आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये पक्षाला १०० हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळू शकतं, असा निष्कर्षही या सर्व्हेमधून काढण्यात आला आहे.
सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र येऊन लढतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेसने राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी होणार की काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाविरोधी मतांच्या होणाऱ्या विभाजनाचा फायदा भाजपाला होऊ शकतो. दुसरीकडे भाजपानेही मुंबई महानगर पालिकेची निवडणूक महायुतीच्या माधमायातून लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र निवडणुकीत उतरल्यास त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो.