‘ई-चालान’विरोधात महामुंबईत चक्काजाम, आंदोलनामुळे पुणे-मुंबई महामार्गाचा वेग मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:47 IST2026-03-06T07:46:56+5:302026-03-06T07:47:10+5:30
वाहतूककोंडीमुळे ट्रॅव्हल्स, स्कूल बसचालकांचा संताप

‘ई-चालान’विरोधात महामुंबईत चक्काजाम, आंदोलनामुळे पुणे-मुंबई महामार्गाचा वेग मंदावला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/ठाणे/कळंबोली : ई-चालान प्रणालीतील कथित मनमानी कारवाईविरोधात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी गुरुवारी धरणे आंदोलन केले. त्यामुळे अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाली. तर, मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येत वाहतूकदारांनी घोषणाबाजी करत निषेध केला.
वाहतूकदार आंदोलकांनी मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या ई-चालान प्रक्रियेचा निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर स्थानिक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले, असे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीचे सदस्य बाबा शिंदे, हर्ष कोटक यांनी सांगितले.
आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील २५० वाहतूकदार सहभागी झाले होते. आंदोलनाकरिता ठाण्यातून वाहने मुंबईला जाण्यासाठी कोपरी चेकनाका येथे मोठ्या संख्येने आल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तसेच कल्याण-शीळ रोडवरही वाहतूकदारांनी आंदोलन केल्याने तेथील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. वाहतूकदारांचा कळंबोली येथे गुरुवारी संताप उफाळून आला. ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स, खासगी वाहन तसेच स्कूल बस चालक-मालकांनी पुणे-मुंबई महामार्गावर वाहने उभी करून चक्काजाम केले.
महामार्गावर वाहनांच्या रांगा; दीड तास खोळंबा
कळंबोली सर्कल परिसरात ट्रक, ट्रॅव्हल्स बस, खासगी वाहने आणि स्कूल बसचालकांनी आपली वाहने महामार्गावर उभी करून निषेध व्यक्त केला. सुमारे दीड तास महामार्ग रोखल्याने पुण्यावरून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवासी आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. कळंबोली सर्कल परिसरात दोन्ही बाजूंनी वाहतूक मंदावल्याने काही काळ संपूर्ण परिसर जाम झाला होता.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे काय?
आंदोलनकर्त्यांच्या मते, ई-चलान प्रणालीमुळे वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात आहे. अनेकवेळा किरकोळ कारणांवरही मोठ्या रकमेचे चालान पाठवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही वेळा वाहनचालकांच्या मोबाइलवर किंवा पत्त्यावर चलानची माहिती वेळेवर पोहोचत नसल्याने अडचणी वाढत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.