Join us  

भाजपाचे राज्य सरकारवर गंभीर आरोप; नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट तर महाविकास आघाडीचे नेतेही भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:51 PM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

ठळक मुद्देसरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहेराज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थितीराज्य सरकारला जाब विचारावा, भाजपाची राज्यपालांकडे मागणी

मुंबई – राज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोप राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपानेराज्य सरकारविरोधात केला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात तक्रार करत जाब विचारण्याची विनंती राज्यपालांना केली. राज्यपालांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, वाधवान प्रकरणात एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सरकारने दिलेलं पत्र सार्वजनिक केल्याने काही दिवसांतच वांद्र्यातील गर्दीचा ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. मुंबईत हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याने अनेक संवेदनशील क्षेत्रातून प्रवास करुन उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आले. त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर हा संपूर्ण प्रसंग त्यांनी स्वत:च कथन केला आहे असं सांगण्यात आलं.

त्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या संपादकांवर थेट एफआयआर दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची धमकी स्वत: राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्र पाठवून दिली. वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, गुन्हे दाखल करणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

तसेच सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहे. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा आता याबाबत राज्य सरकारला जाब विचारला आहे. एकूणच हा प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्त्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणिबाणीसदृश आहेत या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला जाब विचारावा अशी मागणी भाजपा नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

दरम्यान या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या मुद्द्यावरुनही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचसोबत संध्याकाळी ६ च्या सुमारास महाविकास आघाडीचे नेतेही राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजभवनातील हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

यूपीत दोन साधूंच्या हत्येनं खळबळ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन, म्हणाले...

मेहूल चोकसी, रामदेव बाबांसह ५० कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटी कर्ज माफ; आरबीआयकडून नावं उघड

WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोपे नसते; भाजपा नेत्याकडून शिवसेनेच्या टीकेचा समाचार

‘या’ लोकांकडून भाजी खरेदी करु नका; भाजपा आमदाराचं धक्कादायक वक्तव्य

 

टॅग्स :भाजपाराज्य सरकारभगत सिंह कोश्यारी