Join us  

'भाजपाच्या मवाळ भूमिकेमुळेच हल्ला, फडणवीसांनी राजीनामा द्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 8:36 PM

खा. चव्हाण पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही.

मुंबई - राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 15 पोलीस जवानांना वीरमरण आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करून भाजप सरकारच्या नक्षलवाद व दहशतवादाविरोधातील मवाळ भूमिकेचाच हा परिणाम असल्याचा आरोप केला आहे.

खा. चव्हाण पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही. नक्षलवाद्यांनी एवढा मोठा हल्ला करेपर्यंत गृहविभाग काय करत होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत, त्यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.केंद्रातील मोदी सरकार असो वा राज्यातील फडणवीस सरकार, दोन्हीही फक्त मोठ-मोठ्या गप्पा मारण्यातच पटाईत आहेत. या

सरकारच्या काळात देशात अतिरेकी व नक्षलवाद्यांचे हल्ले वाढले. पण, भाजपाला त्याचे काहीही पडलेले नाही. फक्त प्रचारसभेतच घरात घुसुन मारण्याच्या फुशारक्या मारण्यात भाजपवाले पटाईत आहेत. नोटाबंदीने नक्षलवाद व दहशवादाचा बिमोड होणार असल्याचा दावाही यांनीच केला होता. पण, त्याचाही काही परिणाम झालेला दिसत नाही. भाजप सरकारची दहशतवादाविरोधात काही ठोस भूमिका नाही. त्यामुळेच या सरकारच्या काळात दहशतवाद्यांचे व नक्षलवाद्यांचे मनोधौर्य वाढले आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. तसेच गडचिरोलीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात काँग्रेस पक्ष सहभागी असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.नीलम गोऱ्हे शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे नक्षलींच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेधही केला. गडचिरोली जिल्ह्यातील जनतेनी सर्वात जास्त मतदान करून लोकशाहीवरील विश्वास व्यक्त करत असतांना दुसरीकडे लोकशाहीचाच अक्षरशा मुडदा पाडणाऱ्या अशा हिंसक प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी एकजुटीने कामाला लागुया, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :अशोक चव्हाणकाँग्रेसनक्षलवादीदेवेंद्र फडणवीस