Join us  

महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 6:57 PM

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- राम मंदिरासाठी आजवर रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर राम मंदिर उभं राहत आहे. देशानं आता धार्मिक मुद्द्यावर नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षा, महागाई, बेरोजगारी याकडे पाहायला हवं. आज देशाचा रुपया ७७ डॉलर इतक्या ऐतिहासिक पातळीवर आला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळत आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे यावर बोलणं गरजेचं आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली. 

श्रीलंकेतही सत्ताधारी 'अच्छे दिन'चं स्वप्न दाखवून सत्तेत आले होते. आज तिथं लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि सत्ताधाऱ्यांना बदडत आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेले आहेत. त्यांची घरं जाळून टाकत आहेत. श्रीलंकेत जी अवस्था निर्माण झालीय ती परिस्थिती जर भारतात येऊ नये असं वाटत असेल तर लोकांच्या प्रश्नावर सरकारनं लक्ष द्यायला हवं, असं संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊतांच्या या टीकेवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. देशाच्या आर्थिक स्थितीसंदर्भात संजय राऊतांनी काळजी करू नये, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील नेतृत्व ते सांभाळायला सक्षम आहेत. राऊतांनी आधी महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे जरा लक्ष द्यावं. केवळ वक्तव्य करण्यापेक्षा महाराष्ट्रातील परिस्थिती कशी सुधारता येईल, यावर अभ्यास करून महाविकास आघाडी सरकारला आर्थिक स्थिती सुधारण्याच्या विषयी मार्गदर्शन करावं, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

दरम्यान, देशाची अर्थव्यवस्था आज कोसळली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात श्रीलंकेप्रमाणे भारतातील रस्त्यावरही अशीच परिस्थिती निर्माण झाली तर इथं काहीही होऊ शकतं. तिथल्यापेक्षा वाईट परिस्थिती इथं निर्माण होऊ शकते. जर लक्ष दिलं गेलं नाही तर श्रीलंका, कोलंबोसारखी परिस्थिती इथं होईल", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :प्रवीण दरेकरसंजय राऊतशिवसेनाभाजपा