लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ९ मेपासून बेस्ट बसची तिकीट दरवाढ झाल्यानंतर मुंबईकरांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरवाढ झाल्यानंतर महिन्याभरात बस प्रवाशांची संख्या पाच लाखांनी कमी झाली आहे. मात्र बेस्टचा मासिक महसूल सरासरी ७४ कोटी रुपयांनी वाढल्याची नोंद झाली आहे. बेस्ट बसची वाट पाहण्यापेक्षा जवळचे प्रवासी आता रिक्षा वा टॅक्सीने प्रवास करू लागल्याने प्रवासीसंख्येवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट दरात वाढ केली. यापर्वी सरकारच्या निर्देशानंतर जुलै २०१९ मध्ये भाडे कमी करून प्रवासी वाढविण्याचा प्रयत्न बेस्टने केला होता. त्यामुळे प्रवासी संख्या १७ लाखांवरून ३१ लाखांपर्यंत गेली होती. आर्थिक कोंडी वाढत गेल्याने अखेर बेस्टला तिकीट दरात वाढ करण्यास महापालिकेने मंजुरी दिली. पहिल्याच दिवशी २३ लाख १७ हजार प्रवाशांनी जादा दराची तिकीट काढून प्रवास केला, त्यातून २ कोटी ९३ लाख ४१ हजार महसूल जमा झाला होता.
आता शेअर ऑटो - टॅक्सी बरी!
शेअर टॅक्सीला प्रोत्साहन देण्यासाठीच हे भाडे वाढविण्यात आल्याचा आरोप आता प्रवासी संघटनांकडून केला जात आहे. जिथे शेअर टॅक्सी १५ रुपये आकारते, तिथे बेस्टचे भाडे १२ रुपये झाले आहे. आतापर्यंत बससाठी थांबणारे प्रवासी यापुढे शेअर टॅक्सीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. त्यातही एक-दोन किमीच्या प्रवासासाठी १२ रुपये देणे महाग वाटत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.
१२८ बसेस झाल्या कमी
भाडेवाढ झाली त्या दिवशी बसच्या ताफ्यात २७२१ बसगाड्या होत्या, त्यात बेस्टच्या अवघ्या ६०२ बस होत्या व उर्वरित भाडेतत्त्वावरील होत्या. आता २,५९३ बसगाड्या असून त्यात बेस्टच्या अवघ्या ४३६ बसगाड्या राहिल्या आहेत. म्हणजे महिन्याभरात बेस्टच्या ताफ्यातून एकूण १२८ बसेस कमी झाल्या आहेत. त्यात १६६ बस बेस्टच्या स्वमालकीच्या आहेत. दरम्यान, डिसेंबर अखेरपर्यंत भाडेतत्त्वावरील वातानुकूलित २५०० बसगाड्या येण्याची बेस्ट प्रशासनाला अपेक्षा आहे.