Join us  

सत्तेत आहोत म्हणजे वेठबिगार नाही, निलम गोऱ्हेंची निकालानंतर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 5:17 PM

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुंबई - देशातील पाच राज्यांच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून भाजपावर टीका करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी लोकमतशी संवाद साधला. यावेळी, जनतेला कुणीही गृहीत धरू नये. भाजपाने या निकालांमधून धडा घेऊन एनडीएची कार्यपद्धती बदलावी, असेही गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही सत्तेत सोबत आहोत, म्हणजे वेढबिगार नाही. त्यामुळेच सत्तेत राहून आम्ही सत्ताधाऱ्यांना विरोध करतो, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंय. 

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पाचपैकी एकाही राज्यात भाजपाला सत्ता मिळविण्यात यश आले नाही. तर, राजस्थानमध्ये सत्ता राखण्यातही भाजप अपयशी ठरल्याचे दिसून येते. तर मध्य प्रदेशमध्येही अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तेलंगणात तेलुगू जनतेनं भाजपाला स्पष्टपणे नाकारलं आहे. छत्तीसगड अन् मिझोरमध्येही भाजपाची पिछेहाट झाली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर आमदार निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. कुणीही जनतेला गृहीत धरता कामा नये, शेवटी जनता जनादर्न मतपेटीतून उत्तर देते, असे गोऱ्हे यांनी म्हटले. या निकामुळे भाजापाकडे असलेल्या लोकसभेच्या 272 जागांवर आव्हान निर्माण झालं आहे. तेलंगणात भाजपला फटका बसला, यावरुन भाजपने प्रादेशिक पक्षांचा आत्मसन्मान लक्षात घ्यायला हवा. राहुल गांधींचा प्रयत्न जोरात आहे. पण, काँग्रेसच्या संघटनेत सक्षमपणा येईल असे वाटत नाही. कारण, काँग्रेस हा लाटेवर स्वार होणारा पक्ष आहे. त्यामुळे राहुल गांधी शहाणे झालेत की नाही, हे काळच ठरवेल, असा टोलाही गोऱ्हे यांनी लगावला. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत, सत्तेत आम्ही सोबत आहोत, त्यामुळे आमच्यावर नेहमी टीका करण्यात येते. पण, सत्तेत सहभागी आहोत म्हणजे आम्ही वेठबिगार नाही. त्यामुळेच आम्ही सत्तेत राहूनही भाजपावर किंवा सरकारवर टीका करतो, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंय. 

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा प्रश्न उचलला तो अनेक पिढ्यांना न्याय येण्याचा तो प्रयत्न होता. बेगडी धर्मनिरपेक्षता शिवसेना कधीही करत नाही. नगरमधील महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही क्रमांक 1 चा पक्ष बनलो. त्यामुळे राज्यातही आम्हाला एकहाती सत्ता घ्यायची इच्छा आहे. पण, शिवसैनिकांच्या मनातील भावना आणि योग्य वेळ पाहून योग्य तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे गोऱ्हे यांनी म्हटलंय.  

टॅग्स :शिवसेनानीलम गो-हेभाजपाविधानसभा निवडणूक 2018 निकाल