Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांजूर डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीवर बांबू लागवडीचा उतारा; वीजनिर्मितीचा विचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:39 IST

दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

मुंबई - कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळे  परिसरातील रहिवाशांना होणारा दुर्गंधीचा त्रास कमी व्हावा, यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवावी. दुर्गंधी प्रतिरोधक फवारणी वाढवून त्याचे संनियंत्रण करण्यात यावे. डम्पिंग ग्राउंडमध्ये बांबूची लागवड करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

यासंदर्भात मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. गोविंदराज, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. 

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि मुंबई महानगर परिसरातील महापालिकांचे आयुक्त दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.  कांजूरमार्ग येथील पालिकेचा कचरा प्रकल्पात दररोज सुमारे ६,२०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. जमिनीत कचरा साठवणे, कंपोस्ट खत बनवणे आणि कचरा वर्गीकरण या तीन पद्धतींनी काम चालते. परंतु, या डम्पिंगवरील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त आहेत.

‘उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करा’आतापर्यंत जवळपास १९० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या भागात रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होता कामा नये त्यासाठी उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्याचे पालन करावे. दुर्गंधी प्रतिबंधक फवारणी अधिक प्रभावीपणे करण्यात यावी. बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर करून या भागात बांबूंचे घनदाट जंगल निर्माण करावे जेणे करून दुर्गंधी रोखण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

वीजनिर्मितीचा विचार करावाकचऱ्यापासून वीजनिर्मितीसारख्या दीर्घकालीन उपाययोजना प्रकल्पासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी तपासून हा प्रकल्प तातडीने सुरू होईल, यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलावीत, असे निर्देशही यावेळी दिले. रहिवासी भाग कचरा डेपोच्या ज्या क्षेत्राजवळ आहे तेथे खत, आरडीएफ अशा दुर्गंधी येणाऱ्या प्रक्रिया न करता त्या ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावरील भागात कराव्यात, असेही शिंदे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bamboo Solution for Kanjur Dumping Ground Odor; Power Generation Considered

Web Summary : Deputy Chief Minister Eknath Shinde directed officials to implement effective measures to reduce odor from the Kanjurmarg dumping ground, including bamboo cultivation and exploring waste-to-energy projects. High Court directives must be followed, and smelly processes moved further from residential areas.
टॅग्स :एकनाथ शिंदेकचरा