Maharashtra Monsoon Session 2023: इगतपुरीतील एका आदिवासी महिलेला वेळेवर उपचार मिळत नाही, सुविधा मिळत नाही आणि तिचा मृत्यू होतो हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारे नाही, सरकारने या परिस्थितीकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे असे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
इगतपुरी आणि मोखाडा या आदिवासी दुर्गम बहुल भागात केवळ सुविधा नसल्याने दोन गर्भवती महिला दगावल्या. हा मुद्दा आज विधिमंडळ अधिवेशनात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित करण्यात आला, मात्र सरकारने या विषयावर सभागृहात चर्चा नाकारली.
ते आपल्याला शोभणारे नाही
बाळासाहेब थोरात म्हणाले, इगतपुरी मध्ये सरकारच्या उदासीन कारभाराचा नमुना बघायला मिळाला. इगतपुरीतील एका महिलेला प्रसूती वेदना असेही झाल्याने तिला इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यामुळे तिला वडीवऱ्हे येथे असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे तिचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर रस्ता नसल्याने तिचा मृतदेह डोलीतून घरी नेण्यात आला महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात, जर आपण आदिवासी भागांमध्ये दुर्गम भागामध्ये, आरोग्य सुविधा देऊ शकत नसेल तर ते आपल्याला शोभणारे नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
दरम्यान, संपूर्ण स्तरावरच आपण महिलांच्या बाबतीमध्ये निष्काळजी असल्याचे दिसतो. आपण जेव्हा स्वतःला प्रगत म्हणून घेतो आणि दुसरीकडे महिलांना साध्या आरोग्य सुविधा मिळत नसतील तर हे अत्यंत गंभीर आहे. सभागृहात या विषयावर चर्चा व्हायलाच हवी. सरकारने धोरण ठरवायला हवे आणि उपाययोजना करायला हव्यात, असे थोरात म्हणाले.