Join us  

बाळासाहेबांचे खरे स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा, अमृता फडणवीसांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 5:53 PM

अमृता फडणवीस यांनी हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची वेळ भाजपावर आली आहे. त्यात, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आली आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडूनही विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, सरकारला प्रश्न विचारण्यात येत आहे. आता, पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे एक मागणी केली आहे.

अमृता फडणवीस यांनी हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचं आवाहनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अमृता यांनी केलं आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ या ‘acid attack victors’ साठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिताला देण्यात याव्यात. महिला आयोग अध्यक्षाचे पदही लवकर भरण्यात यावे, माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जमिनीवर येऊन पूर्ण करा, असेही म्हणत उद्धव ठाकरेंच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅगही केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर यापूर्वी टीका केली होती. फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. या तीनही पक्षांना भाजप हटाव पाहिजे, त्यामुळे ते भाजपवर खोटे आरोप करत आहेत. आधीच्या सरकारमध्ये शिवसेनादेखील होती. त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, राज ठाकरे यांनी पक्षासाठी नवीन दिशा पाहिली कौतुक वाटते आहे. ते खूप चांगलं काम करतील, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचंही स्वागत केलं होतं. 

दरम्यान, वर्ध्यामधील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र अशाच एका घटनेने हदरला आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्यात आलं. यामध्ये महिला 95 टक्के भाजली होती. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :अमृता फडणवीसशिवसेनाऔरंगाबादहिंगणघाटमहिला