Join us  

Ayodhya Verdict : सर्वधर्मीय धर्मगुरुंच्या माध्यमातून शांततेचे जमात ए इस्लामीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 3:23 PM

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अयोग्य पध्दतीने पडसाद उमटू नयेत व शांतता कायम राहावी यासाठी जमात ए इस्लामीने मुस्लिम समाजासह इतर धर्मगुरु व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शांतताचे आवाहन केले.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अयोग्य पध्दतीने पडसाद उमटू नयेत व शांतता कायम राहावी यासाठी जमात ए इस्लामीने मुस्लिम समाजासह इतर धर्मगुरु व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शांतताचे आवाहन केले आहे. 

ह. भ. प. बद्रीनाथ तानपुरे महाराज, सप्त खंजेरी वादक सत्यपाल महराज शीर्सोलीकर, ह. भ. प. रामदास महाराज जाधव कैकाडी महाराज आश्रम पंढरपूर, बॉम्बे कँथोलिक सभेचे माजी अध्यक्ष डॉल्फी डिसोजा व पद्मभूषण डॉ अण्णा हजारे यांच्यासहित मुस्लिम धर्मगुरुंच्या शांततेचे आवाहन असलेल्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोणतेही वक्तव्य करु नये व कायदा सुव्यवस्था कायम राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन जमात ए इस्लामीच्या सल्लागार समितीचे सदस्य अस्लम गाझी यांनी केले आहे. 

कडेकोट पोलिस बंदोबस्त 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मुस्लिम बहुल विभागासह महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलिस दल व मुंबई पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भेंडी बाजार,  मोहम्मद अली मार्गावर काही ठिकाणी पोलिसांनी संचलन केले. 

प्रतिक्रियात्मक वागणूक टाळा, शांत राहा; मुंबई अमन कमिटीचे आवाहन 

सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल चुकीच्या दिवशी आला आहे. उद्या रविवारी ईद मिलाद निमित्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने मिरवणुकीसाठी रस्त्यावर उतरत असतो. त्यामुळे कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलिसांवरील व धार्मिक नेते व सामाजिक कार्यकर्ता यांच्या वरील जबाबदारीत मोठी वाढ झाली आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी सर्व घटक निश्चितपणे घेतील. मात्र ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर निकाल आल्याने जबाबदारी वाढली आहे. मात्र सर्वांच्या सहयोगाने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घेण्यात येईल,  असे मत मुंबई अमन कमिटीचे अध्यक्ष फरीद शेख यांनी व्यक्त केले आहे. 

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. कित्येक दशकांपासून न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणी न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा निर्णय न्यायालयानं सुनावला. तीन महिन्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी योजना आखा. एक न्यास स्थापन करुन मंदिर निर्माणाचा आराखडा द्या, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. 

 

टॅग्स :अयोध्याराम मंदिरसर्वोच्च न्यायालय