पाणी वाचविण्यासाठी सायकल रॅलीमार्फत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 02:32 IST2019-08-01T02:32:26+5:302019-08-01T02:32:46+5:30

नानाजी देशमुख प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेतर्फे महाराष्ट्रभर जलसंधारण अभियान राबविले जात आहे

Awareness through bicycle rally to save water | पाणी वाचविण्यासाठी सायकल रॅलीमार्फत जनजागृती

पाणी वाचविण्यासाठी सायकल रॅलीमार्फत जनजागृती

मुंबई : मुंबई शहर, उपनगरातील विविध भागामधील नागरिकांनी एकत्र येऊन नुकतेच सायकल रॅली काढली. पाणी वाचविण्यासाठी सायकल रॅलीमार्फत जनजागृती करण्यात आली. ओशीवरा, लोखंडवाला रस्ता, चार बंगला, यारी रस्ता, वर्सोवा आणि अंधेरी - पश्चिमेकडील सेलिब्रेशन क्लब या मार्गे सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी व इतर क्षेत्रातील व्यावसायिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबईचा डब्बेवाला आणि सेलिब्रिटी यांची उपस्थिती होती. तसेच जवळपास २५० सायकलस्वार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

नानाजी देशमुख प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेतर्फे महाराष्ट्रभर जलसंधारण अभियान राबविले जात आहे. रॅली दरम्यान जनशक्ती-जलशक्ती या मोहिमेची जनजागृती करण्यात आली. संजय पांडे हे गेल्या तीन वर्षांपासून विदर्भातील लातूर आणि वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानावर काम करत आहेत. सायकल रॅलीचे आयोजन महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव संजय पांडे यांनी केले होते. संजय पांडे म्हणाले की, जेव्हा ग्रामीण भागातील लोकांची भीषण पाणीटंचाईची परिस्थिती व संसाधनांचा अभाव दिसून येतो. तेव्हा लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. दरम्यान, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सायकल चालविणे आवश्यक आहे. तसेच सायकल चालवून निरोगी राहण्याचा संदेश देण्यात आला. सर्वांनी पाण्याची बचत सुरू करण्याचे यावेळी आवाहन केले.
 

Web Title: Awareness through bicycle rally to save water