Join us  

Andheri Bridge Collapse : मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 1:32 PM

उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे'', अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. 

मुंबई - अंधेरी पूल दुर्घटनेवरुन रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली जात आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनवर पूल कोसळल्याच्या घटनेवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपा सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ''अंधेरी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल कोसळून पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे'', अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. 

(Andheri Bridge Collapse : पश्चिम रेल्वेवरील वाहतूक मध्यरात्रीपर्यंत होणार पूर्ववत)

पूल कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच रेल्वेमंत्री  पीयूष गोयल यांनी रेल्वे सुरक्षा आयोगामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. अंधेरीजवळ पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अधिका-यांना इतर विभागांशी संपर्क ठेवून ढिगारा बाजूला करून स्थिती पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिका-यांची बैठक बोलावली होती.

मंगळवारी दुपारी 2 वाजता रेल्वेमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पश्चिम रेल्वे आणि 4 वाजता मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी रेल्वे मंत्री संवाद साधणार होते. मात्र अंधेरी पूल दुर्घटनेमुले पुन्हा रेल्वे मंत्र्यांची बैठक रद्द होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यापूर्वी रविवारी बोलावलेली बैठक अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली होती, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

पूल दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्पअंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा गोखले पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनिश्चित काळासाठी पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्यानं त्याचा मनस्ताप ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय.

सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला. या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. याचा फटका हार्बर रेल्वेलादेखील बसला आहे. पूल कोसळल्यानं दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुलाचा कोसळलेला भाग बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जोरदार पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत. 

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनामुंबईचा पाऊसपश्चिम रेल्वेअशोक चव्हाण