...आणि सनई-चौघड्याचे सूर हवेत विरले; मुंलुंडमध्ये अपघातात मृत्यू झालेले रामधन यादव लग्नासाठी आले होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 05:05 IST2026-02-15T05:05:15+5:302026-02-15T05:05:37+5:30
अपघात एवढा भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता, दोघे नातेवाईक त्या खाली दबले गेले होते. त्यांना स्थानिकांनी कसेबसे बाहेर काढले आणि शेजारीच असलेल्या उपासनी रुग्णालयात दाखल केले.

...आणि सनई-चौघड्याचे सूर हवेत विरले; मुंलुंडमध्ये अपघातात मृत्यू झालेले रामधन यादव लग्नासाठी आले होते
मुंबई : रामधन यादव यांच्या नातीचे आज लग्न होते. कळव्यात लग्नाची तयारी सुरू होती. सगळे नातेवाईक आनंदी होते. काही कामानिमित्त रामधन आणि त्यांचे दोन नातेवाईक स्वतःच्या रिक्षाने मुलुंड परिसरात जात असताना रामधन यांच्यावर काळाने घाला घातला.
अपघात एवढा भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता, दोघे नातेवाईक त्या खाली दबले गेले होते. त्यांना स्थानिकांनी कसेबसे बाहेर काढले आणि शेजारीच असलेल्या उपासनी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी रामधन यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. जखमी राजकुमार यादव हे स्वतः रिक्षा चालवत होते, तर रामधन आणि महेंद्र यादव मागे बसले होते. राजकुमार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिचे लग्न होते ती राजकुमार यांची भाची होती.
टीव्हीवर समजले वृत्त
यादव कुटुंबातील काही सदस्यांना वृत्तवाहिनीवरून अपघाताचे वृत्त समजले. आपल्या कुटुंबातील सदस्य रिक्षा घेऊन मुलुंड परिसरात गेल्याचे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजकुमार यांचा फोन पोलिसांच्या ताब्यात होता, त्यांनी घटनेची माहिती दिली, त्यानंतर आम्ही रुग्णालय गाठले, असे आनंद यादव यांनी सांगितले. रुग्णालय खासगी असल्याने सर्वांना प्रवेश दिला जात नव्हता. दरम्यान, नातेवाईक उत्तर प्रदेशच्या जोनपूर येथील असून, ते कळव्याचे रहिवासी आहेत.