Join us  

"50 टक्के क्षमतेने मंगलकार्य चालवायला परवानगी द्या, अन्यथा...", मुंबई कॅटरर्स संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 3:37 PM

Mumbai Caterers Association : पालिका व पोलिसांची लग्न सोहळ्यात धाड पडणार या चिंतेत वधू वर मंडळी तसेच मंगल कार्यालयाचे मालक वर्ग व आयोजक आहेत.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : गेल्या मार्चपासून कोरोनामुळे टाळेबंदी लागल्यानंतर सर्वात मोठा फटका हा लग्नसराई व्यवसायाला बसला असून आतापर्यंत 4000 कोटींचा फटका बसला आहे. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचेकारण पुढे करत मुंबईतील मंगल कार्यालये सध्या मुंबई महापालिकेकडून टार्गेट केले जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्न सोहळ्यात आता फक्त 50 माणसे हवीत असा फतवा मुंबई महापालिकेने काढल्याने विशेष करून लग्नाची तारीख आणि मंगल कार्यालय बुक केलेले वधू वर मंडळी तर खूप हवालदिल झाली आहेत. त्यामुळे लग्नाचे पूर्वी आमंत्रण दिलेल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना चक्क आम्हाला माफ करा, तुम्ही लग्नाला येऊ नका असे नाईलाजाने सांगावे लागत असल्याची अवस्था सध्या मुंबईतील वधू वर मंडळींची झाल्याचे चित्र आहे. 

पालिका व पोलिसांची लग्न सोहळ्यात धाड पडणार या चिंतेत वधू वर मंडळी तसेच मंगल कार्यालयाचे मालक वर्ग व आयोजक आहेत.तर दुसरीकडे लग्न सोहळ्यात आता फक्त 50 माणसे हवीत असा फतवा महापालिकेने काढल्याने चक्क वधू वर मंडळी त्यांचे लग्न सोहळे रद्द करत आहेत किंवा अनेकवेळा 50 माणसांना प्रवेश दिला जाईल, असे आम्ही सांगताच आमचे व वधू वर  मंडळींचे काही वेळा खटके उडत आहे अशी माहिती मुंबई कॅटरर्स संघटनेचे सदस्य सुनील वेंगुर्लेकर यांनी 'लोकमत'ला दिली.

महानगर पालिकेच्या लग्न सोहळ्यात आता फक्त 50 माणसे हवीत असा फतव्यामुळे लग्नसराई व्यवसाय डबगाईला असून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या 30,000 कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. यावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी काल रात्री अंधेरी पूर्व साकीनाका येथील पेंन्युनसूला हॉटेलमध्ये मुंबई कॅटरर्स संघटनेच्या सदस्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष योगेश चंदाराणा,सचिव सतिश कामत,खजिनदार समीर पारेख, सदस्य सुनील वेंगुर्लेकर यांच्यासह मुंबईतील इतर 24 सदस्य उपस्थित होते.

येत्या आठवड्यात मुंबईच्या नाक्या नाक्यावर हातात फलक घेऊन मुंबई कॅटरर्स संघटनेचे सदस्य आणि कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर उतरून मुंबईच्या चौका-चौकात हातात फलक घेऊन आंदोलन करतील असा म्हत्वाचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती वेंगुर्लेकर यांनी दिली. एकीकडे मुंबईत कोरोनाचे  नियम शिथील केल्या नंतर 50 टक्के क्षमतेने हॉटेल्स, पंचतारांकित हॉटेल्स, बार, तसेच नाट्यगृह, चित्रपट गृह  यांना चालवण्यास परवानगी देण्यात आली. 

तर दुसरीकडे आम्ही सर्व  नियम पाळत असून स्वतः मंगल कार्यालयात मास्क शिवाय कोणाला प्रवेश दिला जात नाही, सोशल डिस्टनसिंग पाळले जाते,सामाजिक बांधिलकी ठेवत मास्कचे वाटप करतो. तर दुसरीकडे आम्ही कॅटरिंग व्यवसायातील उद्योजकांना मात्र 50 माणसांना प्रवेश दिला जाईल हा एक प्रकारे आमच्यावर एक मोठा अन्याय आहे. आगामी लग्नसराईचा मोसम लक्षात घेता मुंबईतील मंगल कार्यालयाच्या 50 टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई पालिका आयुक्त यांना मुंबई कॅटरर्स संघटनेने दिले आहे. मात्र, यावर अजून काही निर्णय सरकार व पालिकेने घेतला नाही, त्यामुळे येत्या आठवड्यात मुंबईच्या नाक्या नाक्यावर हातात फलक घेऊन मुंबई कॅटरर्स संघटनेचे सदस्य आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुनील वेंगुर्लेकर यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई