आयआयटीच्या एमबीएसाठी सर्व विद्याशाखांना मान्यता; पदवीधर विद्यार्थ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:17 IST2025-06-06T14:17:10+5:302025-06-06T14:17:43+5:30
प्रवेशासाठी ‘कॅट’ देणे बंधनकारक, एससीसाठी अट शिथिल

आयआयटीच्या एमबीएसाठी सर्व विद्याशाखांना मान्यता; पदवीधर विद्यार्थ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आयआयटी मुंबईच्या शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटतर्फे राबविल्या जाणाऱ्या एमबीए अभ्यासक्रमासाठी आता कोणत्याही विद्याशाखेची पदवी असलेला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहे.
आयआयटी मुंबईने या अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषांमध्ये बदल केला असून, आता तीन वर्षे अभ्यासक्रमाची कोणतीही पदवी दहापैकी ६.५ एवढ्या क्युम्युलेटिव्ह परफॉर्मन्स इंडेक्सने (सीपीआय) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. मात्र त्यासाठी त्यांना एमबीए प्रवेशासाठीची कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) देणे बंधनकारक असेल.
आयआयटी मुंबईत एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यापूर्वी चार वर्षांची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र, यापूर्वी इंजिनिअरिंग अभ्यासक्रमच चार वर्षांचा होता. त्यामुळे अन्य विद्याशाखांचे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकत नव्हते. त्यातून विविध विद्याशाखांचे विद्यार्थी व्यवस्थापन अभ्यासक्रमाकडे वळावेत या उद्देशाने आयआयटीने हा निर्णय घेतला आहे.
आयआयटी मुंबईमार्फत २०२५-२७ या वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी हे बदल लागू केले जाणार आहेत. आयआयटीच्या अधिसभेत त्याचा निर्णय घेण्यात आला असून या माध्यमातून एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शाखांचे वैविध्य असावे, हा हेतू ठेवण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही नोंदणी करू शकतात. मात्र, त्यांनी दिलेल्या शेवटच्या परीक्षेत त्यांना किमान ६० टक्के गुण मिळालेले असणे अनिवार्य आहे.
एससीसाठी अट शिथिल
एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही अट ५५ टक्क्यांपर्यंत शिथिल केली आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना देशपातळीवर एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली कॅट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, असे आयआयटी मुंबईने जाहीर केले आहे.