मुंबई :अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सहाव्यांदा पदाची शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार एकमेव नेते ठरले आहेत.
अजित पवार १९९१ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येत आहेत. अर्थमंत्री, जलसंपदामंत्री आणि ऊर्जामंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. पण जलसंपदामंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपशी युती करत पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पण तीन दिवसांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये अजित पवार बंड करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. गुरुवारी ते पुन्हा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.
उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची कारकीर्द
nनोव्हेंबर २०१० - सप्टेंबर २०१२ (काँग्रेस आघाडी)
nऑक्टोबर २०१२ - सप्टेंबर २०१४ (काँग्रेस आघाडी)
nसन २०१९ (पहाटेचा शपथविधी) २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ (भाजप युती) nडिसेंबर २०१९ ते जून २०२२ (महाविकास आघाडी)
nजुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२४ (महायुती)