अंदाज समितीच्या सदस्यांसाठी ४५०० रुपयांचे ताट? विधीमंडळ म्हणतं, "ते चांदीचे नाही, तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:54 IST2025-06-25T14:51:00+5:302025-06-25T14:54:00+5:30
विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या शाही जेवणावरुन वाद सुरु झाल्यानंतर आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अंदाज समितीच्या सदस्यांसाठी ४५०० रुपयांचे ताट? विधीमंडळ म्हणतं, "ते चांदीचे नाही, तर..."
Legislative assembly Estimate Committee Royal Meal Controversy: विधीमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाटाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विधीमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या ताटातून जेवण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंदाज समितीच्या कार्यक्रमात दोन दिवस फाईव्हस्टार असा पाहुणचार केल्यावरुन विरोधकांनी संताप व्यक्त केला. अंदाज समिती राज्याला काटकसर करण्यासंदर्भात सातत्याने सूचना देत असते. मात्र या समितीच्या कार्यक्रमातच पैशांची उधळपट्टी करण्याचा आल्याचे म्हटलं जातंय. दुसरीकडे आता विधीमंडळाने या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
संसदेच्या तसेच विविध राज्यांमधील विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्षांच्या दोन दिवसांच्या परिषदेचा समारोप विधान भवनात झाला. मात्र या कार्यक्रमानंतर झालेल्या शाही जेवणावरुन राजकारण पेटलं आहे. संसद तसेच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्यांसाठी चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नांचा बेत करण्यात आला होता. यासाठी चांदीच्या एका थाळीचे भाडे ५५० रुपये तर जेवणाची प्लेट चार हजार रुपयांची होती. त्यानुसार एका व्यक्तीच्या जेवणावर राज्य विधिमंडळाने तब्बल साडेचार हजार रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला.
अंदाज समितीच्या परिषदेचा मंगळवारी मुंबईत समारोप झाला. या समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून जेवण दिल्याचा आरोप करण्यात आला. अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि २५० सदस्य आणि ३५० अधिकारी असे ६०० जण या परिषदेत सहभागी झाले होते. तसंच ताज पॅलेस आणि ट्रायडंटला राहण्याची सोय करण्यात आली होती. हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवासासाठी वाहनं आणि मुंबई दर्शनची सहलही आयोजित करण्यात आली होती.
निखिल कॅटरर्सकडून ही जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये चांदीची भांडी भाड्याने आणली गेली. बैठक व्यवस्थेत जेवणासाठी चांदीची ताटं, चमचे, वाट्या, ग्लास होते. या शाही भोजनामध्ये कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दहीवडे, बटाट्याची भाजी आणि पुरण पोळी असा मराठमोळा मेन्यू होता.
दरम्यान आता या आरोपांवर विधीमंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या परिषदेत वापरण्यात आलेली जेवणाची ताटे ही चांदीची नसून व्हाईट मेटल आर्टिफिशयल अशी ही ताट होती. तर जेवणाचे दर सुद्धा ४५०० रुपयांवरून निम्मी होते, असं विधीमंडळाकडून सांगण्यात आलं आहे.