Join us  

परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बनंतर अमृता फडणवीसांचा 'शायरीतून निशाणा' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 7:48 AM

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत.

ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनीही वाझे प्रकरणात उडी घेतली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडेलल्या स्फोटकांवरुन राज्यात सुरु असलेल्या घडामोडीवर भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर दोन दिवसांपूर्वीच निशाणा साधला होता.

मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यानंतर, विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचं म्हटलंय. तर, अमृता फडणवीस यांनीही याप्रकरणी ट्विट केलंय. 

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले. तर, दुसरीकडे अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत ट्विट केलंय. 

अमृता फडणवीस यांनीही वाझे प्रकरणात उडी घेतली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडेलल्या स्फोटकांवरुन राज्यात सुरु असलेल्या घडामोडीवर भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर दोन दिवसांपूर्वीच निशाणा साधला होता. "व्यवहार माझे, जबाबदार वाझे!, सांगा पाहू कोणकोणास म्हणाले", असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. (amruta fadnavis tweet on sachin vaze case ) त्यानंतर, आता परमबीर सिंग यांच्या पत्रानंतरही अमृता फडणवीस यांनी आपलं मत मांडलंय. बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?,

असे ट्विट अमृता यांनी केलंय. अमृता यांच्या ट्विटचा रोख मुख्यमंत्री अन् गृहमंत्री यांच्याकडे असल्याचं दिसून येतंय. कारण, परमबीरसिंग यांच्या पत्राचे वृत्त माध्यमांत झळकताच त्यांनी हे ट्विट केलंय. 

काय म्हणाले फडणवीस

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा. या संपूर्ण आरोपींची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हायला हवी. राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी चौकशी मान्य नसल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. परमबीर सिंग डीजी म्हणून कार्यरत आहेत. डीजी म्हणून काम करत असलेल्या अधिकाऱ्यानं केलेले आरोप गांभीर्यानं घ्यायला हवेत. याशिवाय परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपात संभाषणदेखील जोडलं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांचं गांभीर्य वाढतं. मुख्यमंत्री ठाकरेंनी अनेकदा दोषी असल्यासकारवाई करण्याची भाषा केली आहे. त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवावेत, असं फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांचे आरोप

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना पूर्वीच कल्पना दिली होती, असा  दावा पत्रात केला आहे. मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अँटिलिया प्रकरणाची पूर्ण माहिती देत होतो. त्या वेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले होते. इतकेच  नाहीतर, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरेतर ही माहिती आधीच होती असे माझ्या लक्षात आले. सचिन वाझे हे गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री देशमुख यांनी कित्येक वेळेस त्यांना त्यांच्या ज्ञानेश्वर निवासस्थानी बोलावून दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले होते, असा आरोप सिंग यांनी पत्रात केलाय.  

टॅग्स :अमृता फडणवीसअनिल देशमुखपरम बीर सिंगसचिन वाझे