मुंबई - मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाला जाग आली आहे. शनिवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिका-यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर पियुष गोयल यांनी सांगितले की, रेल्वेवरील पादचारी पुलाला 150 वर्षांपासूनची प्रवासी सुविधा असा दर्जा होता. आता यामध्ये बदल करत पादचारी पुलांना अत्यावश्यक सुविधेचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय रेल्वेतील महाव्यवस्थापक यांना सुरक्षेबाबत उपाय योजना राबवण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासकीय किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे रेल्वेसंबंधीच्या विविध सुरक्षा विषयक कामांना विलंब होतो. हा विलंब टाळण्यासाठी या कामांचे अधिकार आता महाव्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच्या प्रकल्पांसाठीच्या खर्चाचे अधिकार त्यांना असणार आहेत. त्याचबरोबर मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त स्वयंचलित जिने उभारले जाणार असल्याचेही गोयल यांनी सांगितले. रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकारी पश्चिम आणि पूर्व रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे मुद्दे पियुष गोयल यांनी ट्विट केले आहेत. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशन व सर्वाधिक गर्दी असणा-या स्टेशनवर अतिरिक्त सरकते जिने लावण्यासाठी मान्यता देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले. शिवाय,मुख्यालयातील 200 वरिष्ठ अधिकाऱ्यांना फिल्ड ड्युटी देणार, असेही त्यांनी सांगितले. तसेच पुढील 15 महिन्यात सर्व उपनगरीय ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. त्याचवेळी देशभरातील ट्रेनमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम केले जाईल, अशीही माहिती गोयल यांनी दिली आहे.
बैठकीनंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना रेल्वेमंत्री पियुष गोयल असे म्हणालेत, की जीलोकं बुलेट ट्रेनला विरोध करत आहेत त्यांनी जनतेला उत्तर द्यावे की त्यांची जनतेला असुरक्षित ठेवण्याची इच्छा आहे का? - पियुष गोयल, रेल्वे मंत्री
शुक्रवारी नेमके काय घडले परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर?
कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने शुक्रवारी खरी ठरली. एलफिन्स्टन रोड स्थानकावर शुक्रवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी होऊन 8 महिला आणि एका लहान मुलासह तब्बल 22 जणांचा यात बळी गेला, तर 39 प्रवासी जखमी झाले. तर शनिवारी उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही पहिलीच घटना आहे. देशभरात नवरात्रीचा उत्साह संचारलेला असताना दस-याच्या तोंडावर मुंबईकरांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. मुंबईच्या इतिहासात आणखी एका ‘ब्लॅक फ्राय डे’ची नोंद झाली.
पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोडवरील पुलावर नेहमीच गर्दी असते. मध्य रेल्वेतील परळ स्थानकाला जोडणारा हा पादचारी पूल असल्याने प्रवासी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. शुक्रवारी सकाळी परतीच्या पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. यामुळे एलफिन्स्टन रोड स्थानकातील पायºया निसरड्या झाल्या होत्या. पावसामुळे प्रवासी आडोशासाठी पुलावर उभे राहिले. स्थानकांवरील गर्दी वाढत असतानाच अचानक ‘पूल कोसळला’, ‘शॉटसर्किट झाले’ अशा अफवांचे पेव फुटले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ६ ते ७ फुटांच्या पूलावरून बाहेर जाण्यासाठी प्रत्येक प्रवासी धडपडत होता. यावेळी स्थानकावर एकाचवेळी अप आणि डाऊन दिशेने लोकल आल्यामुळे गर्दीत आणखी भर पडली.
गर्दीमुळे रेटारेटीचा जोर वाढल्याने अनेक प्रवासी पायांखाली तुडवले गेले. या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त झाली. रेल्वे प्रशासनाने आणि राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे मुंबईतील रेल्वेचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.
मृतांची नावे
मुकेश मिश्रा, शुभलता शेट्टी, सुजाता शेट्टी, सचिन कदम, मयुरेश हळदणकर, अकुंश जयस्वाल, जोतिबा चव्हाण, सुरेश जयस्वाल, चंद्रभागा इंगळे, तेरेसा फर्नांडिस, रोहित परब, अॅलेक्स कोरिया, हिलोनी देढिया, चंदन गणेश सिंग, मुश्ताक रईस, तेली, प्रियांका पासरकर, मोहम्मद शकील, श्रद्धा वर्पे, मीना वरुणकर, विजय बहादूर, मसूद अलाम, सत्येंद्रकुमार कनोजिया
जखमींची नावे
आकाश परब, अजय कुमार, अनुज कुमार, अखिलेश चौधरी, जितेंद्र, जमालुद्दीन, इस्माइल खान, मोहम्मद शेख, नितेश, नरेश कांबळे, पीयूष ठक्कर, पुलवासी, प्रल्हाद कनोजिया, राहून अमिन, रुपेश, रमेश चौधरी, राकेश कदम, राहुल, श्रीनिवास, समीर फारुख, सूरज गौड, सुदीप तावडे, सुरज पटवा, रितेश राठोड, सागर पाटील, वसिम शेख, सुनील मिश्रा, विक्रम चौघुले, प्रमोद बागवे, अपर्णा सावंत, आशा पिंपळे, धुनिष्ठा जोशी, महानंदा सावंत, प्रतिभा, प्रज्ञा बागवे, शरयु गावडे, श्रद्धा नागवेकर, सीमा कोरी
टाइमलाइन
सकाळी ९.३० : परतीच्या पावसाची मुंबईत जोरदार हजेरी
९.४५ ते १०.१० : स्थानकांवर गर्दीचे प्रमाण वाढले
१०.३० : रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती
१०.३३ : स्थानिकांचा एल्फिन्स्टन स्टेशन मास्तरला फोन
१०.४५ : स्थानिकांचा मदतीसाठी पुढाकार
११.०० : सर्व पोलिस स्थानकांना अलर्टच्या सूचना
११.३० : एल्फिन्स्टन दुर्घटनेत तीन प्रवासी ठार झाल्याचे वृत्त
११.३२ : रेल्वे पोलीस व सुरक्षा बलाचे अधिकारी घटनास्थळी
११.३८ : केईएम रुग्णालयात तीन मृत्यूंचा दुजोरा
११.४५ : केईएममधून १५ प्रवासी ठार झाल्याची माहिती
११.५० : पालिकेसह शासकीय यंत्रणेचे मदतकार्य
१२.०० : एनडीआरएफचे
पाच जवान घटनास्थळी दाखल
१२.१० : वरिष्ठ रेल्वे अधिका-यांकडून अपघात स्थळाची पाहणी
१२.२५ : केईएममधून
२२ जण ठार झाल्याची माहिती