Join us  

अभिनेता अतुल कुलकर्णींचं एका वाक्याचं ट्विट, नेटिझन्स म्हणाले... 'सॉलिड'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 1:55 PM

आज मराठी माणूस भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली. हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही.

ठळक मुद्देअतुल यांचं हे ट्विट विक्रम गोखलेंना सॉलिड चपराक असल्याचं काही नेटीझन्सने म्हटले आहे. 

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात कंगनाच्या विधानाचं समर्थन केल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. तसेच, गोखले यांनी राजकीय भूमिकांवरही भाष्य केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्यावर टीका केली. आता, मराठमोळा परफेक्शनिस्ट अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी ट्विट केलेलं एक वाक्य चांगलंच चर्चेचा विषय ठरलं आहे. अतुल यांचं हे ट्विट विक्रम गोखलेंना सॉलिड चपराक असल्याचं काही नेटीझन्सने म्हटले आहे. 

आज मराठी माणूस भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली. हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, कंगनाने देशाच्या स्वातंत्रतेबद्दल केलेल्या विधानाचेही त्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे, ते सध्या नेटीझन्सच्या निशाण्यावर आहेत. अतुल कुलकर्णी यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये, 'ज्येष्ठता आणि शहाणपणा या दोन भिन्न गोष्टी आहेत', असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कुणाचाही उल्लेख केला नाही. #globalphenomenon असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. मात्र, नेटीझन्सने या ट्विटचा अर्थ आणि रोख हा विक्रम गोखलेंना निशाणा करण्यावर असल्याचं म्हटलंय. त्याधमध्ये, एकाने सॉलिड अशी कमेंट करत हे ट्विट रिट्विट केलंय. 

ब्राह्मण महासंघातर्फे गोखलेंचा सत्कार

ब्राह्मण महासंघातर्फे रविवारी विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद दिले असते तर काय बिघडले असते. हे पद दिले नाही, ही आमची चूक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मान्य केले. जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. लोकांना फसवू नका अन्यथा लोक शिक्षा करतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. 

इतिहास बदल्याचे षड्यंत्र

देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप आणि सेनेने एकत्र आले पाहिजे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तरुणाईला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे. या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आली आहे. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही. आम्ही तसे होऊच देणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष फायद्यासाठी हिंदू-मुस्लीम, मराठा-ब्राह्मण, मराठा-दलित, दलित-ब्राह्मण तेढ निर्माण करतात, असा आरोप त्यांनी केला.

कंगनाच्या मताशी समहत

स्वातंत्र्य भीक मागून मिळाले, या कंगना रनौतच्या मताशी मी सहमत आहे. कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, तर ते भीक मागून मिळाले. 

महागाई मोदींनी वाढवली का?

महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का? अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी १० हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहीत आहे का?, असा सवालही त्यांनी केला.  

टॅग्स :अतुल कुलकर्णीविक्रम गोखलेशिवसेनाकंगना राणौत