मुंबई - पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली मानखुर्दमधील तरुणाचे बँक खातेच रिकामे झाले. सायबर ठगांनी टास्क फ्राॅडच्या जाळ्यात अडकवून २ लाख ६५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
ओमकार (२१, रा. मंडाळा) हा शिक्षणासोबतच पार्ट टाइम जॉबच्या शोधात होता. १८ मार्चला मोबाइलवर सायबर ठगांनी पार्ट टाइम जॉबसंबंधी एक मेसेज पाठवला. त्या मेसेजला त्याने प्रतिसाद दिला. ओमकारला त्या सायबर ठगांनी गुगल मॅपवरून रेस्टाॅरंटला रिव्ह्यू देण्याचा टास्क दिला. ओमकारने तो टास्क पूर्ण करताच त्याच्या बँक खात्यात २०० रुपये पाठवून सायबर ठगांनी त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर पेड टास्क देत ठगांनी त्याच्याकडून दोन दिवसांत २ लाख ६५ हजार रुपये उकळले. पुढे पैसे भरूनही हाती काहीच न लागल्याने ओमकारला फसवणूक झाल्याचा संशय आला. त्याने पुढील व्यवहार थांबवत पोलिसांत धाव घेतली.