Join us  

प्रलंबित जल देयकांबाबतच्या अभय योजनेस ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 5:27 PM

Water Bill : लाभार्थींना ३०.५५ कोटींची सूट; तर त्या सोबतच झाली १३८ कोटींची वसुलीही

३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत अभय योजनेचे ५६ हजार ९६४ लाभार्थी

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचे (Water Bills) अधिदान हे जलदेयकाच्या दिनांका पासून एका महिन्यात अदा करणे बंधनकारक असून एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. तथापि, या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्‍यासाठी ‘अभय योजना २०२०’ ही दिनांक १५ फेब्रुवारी, २०२० पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेला मिळत असलेला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून दिनांक *३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ५६ हजार ९६४ जल-जोडणी धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजने अंतर्गत दिनांक ३१ ऑक्टोबर पर्यंत जल-जोडणी धारकांकडून १३८.१९ कोटी रुपयांचा भरणा (Payment) महापालिकेकडे करण्यात आला आहे. तर या योजनेअंतर्गत महानगरपालिकेद्वारे देखील तब्बल ३०.५५ कोटी रुपयांची सूट जल-जोडणी धारकांना देण्यात आली आहे. या योजनेला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेत, या योजनेला आता दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी संबंधित नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,* असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे करण्‍यात येत आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे आपल्या क्षेत्रातील सव्वा कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दररोज सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर (३८५ कोटी लीटर) पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. देशातील सर्वात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरविणारी महानगरपालिका, असा लौकिक असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे, यासाठी तब्बल ३ हजार ४०० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करते. यासाठी नागरिकांद्वारे भरणा करण्यात येणा-या पाणी देयकांच्या रकमेचा सुयोग्यप्रकारे व नियोजनपूर्वक विनियोग करण्यात येतो. ही बाब लक्षात घेता, सुव्यस्थित पाणीपुरवठा नियमितपणे व्हावा, याकरिता नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचे (Water Bills) अधिदान हे जलदेयकाच्या दिनांका पासून एका महिन्यात अदा करणे बंधनकारक आहे. तसेच एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते.

देयकाच्या रकमेवर साधारणपणे दर महिन्याला २ टक्के यानुसार ही आकारणी केली जाते. तथापि, या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्‍यासाठी ‘अभय योजना २०२०’ ही दिनांक १५ फेब्रुवारी, २०२० पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेला मिळत असलेला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षात घेत ‘अभय योजना २०२०’ला आता दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

वरीलनुसार सर्व जल-जोडणी ग्राहकांना असे आवाहन करण्‍यात येत आहे की, त्‍यांनी त्‍यांच्‍या प्रलंबित जल देयकातील (Outstanding Water Bill) जलआकार, मलनिःसारण आकार आणि‍ जलमापक भाडे यांचे एकरकमी अधिदान (Payment) करुन तसेच अभय योजनेच्‍या कालावधीत निर्गमित झालेल्‍या सर्व जल देयकांचे अधिदान दिनांक ३१ डिसेंबर २०२० पूर्वी करुन या योजनेचा लाभ घ्‍यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्‍या संबंधित विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता (जलकामे) (Assistant Engieer, Water Works) यांच्‍याशी संपर्क साधावा व जास्‍तीत-जास्‍त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईपाणी