सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही परीक्षा; मुंबईकरांच्या समस्यांबाबत निर्णायक भूमिका महत्त्वपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:23 IST2026-02-09T11:22:01+5:302026-02-09T11:23:04+5:30
विरोधी पक्षात संख्येने कमी नगरसेवक असले तरी विरोधी पक्ष कमकुवत नाही. भाजप-शिंदेसेनेला बहुमत मिळाले असले तरी विरोधी पक्षाला मोठी ताकद मुंबईकरांनी दिली आहे.

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही परीक्षा; मुंबईकरांच्या समस्यांबाबत निर्णायक भूमिका महत्त्वपूर्ण
मुंबई - मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जनतेने सत्ताधारी महायुतीला बहुमत दिले असले, तरी विरोधी पक्षाचेही १०० पेक्षा अधिक नगरसेवक असल्याने पुढील पाच वर्षे सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. काही प्रमुख पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले आहे. उद्धवसेना, कॉंग्रेस, मनसे, एमआयएम यांसारखे पक्ष संख्याबळाने कमी ठरल्याने विरोधी बाकांवर बसण्याची भूमिका त्यांच्यावर येणार आहे.
संख्येने कमी असले तरी मुंबई आणि मुंबईकरांच्या प्रश्नांवर महापालिका सभागृहात आवाज उठवण्याची तयारी विरोधी पक्षांनीकेली आहे. गेली ३० वर्षे सत्तेत राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या वेळी मुंबईकरांनी २२७ पैकी केवळ ६५ जागा देत विरोधी पक्षात बसवले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत युतीत लढलेल्या मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. यंदा मुस्लिम मतदारांनी समाजवादी पक्षाला नाकरत, एमआयएम या पक्षाला पसंती दिली तर कॉँग्रेसने आपली पारंपरिक मते घेत २४ जागी यश मिळवले. विरोधी पक्षात संख्येने कमी नगरसेवक असले तरी विरोधी पक्ष कमकुवत नाही. भाजप-शिंदेसेनेला बहुमत मिळाले असले तरी विरोधी पक्षाला मोठी ताकद मुंबईकरांनी दिली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, झोपडपट्टी पुनर्वसन, आरोग्य सेवा, शिक्षण, पर्यावरण यांसारख्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे हीच त्यांची खरी ताकद ठरेल.
‘प्रशासनाच्या निर्णयांवर बारकाईने लक्ष हवे’
उद्धवसेनेने सत्तेतील अनुभवाच्या आधारे प्रशासनाच्या निर्णयांवर बारकाईने लक्ष ठेवणे अपेक्षित आहे, तर मनसेकडून मराठी माणसांचे प्रश्न, स्थानिक रोजगार आणि शहरातील नागरी शिस्त यावर ठाम भूमिका मांडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. एमआयएमसारख्या पक्षांकडून अल्पसंख्याक वस्त्यांतील नागरी सुविधा, शिक्षण व आरोग्य यांसारख्या प्रश्नांना व्यासपीठ मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. विरोधी बाकांवर बसलेले नगरसेवक अभ्यासपूर्ण सूचना,वेळोवेळी सूचना आणि गरज पडल्यास तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला योग्य दिशा देऊ शकतात. त्यामुळे संख्याबळ कमी असले तरी मुंबईच्या सर्वांगीण विकासात विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.