परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:38 IST2026-04-12T10:38:14+5:302026-04-12T10:38:39+5:30
Central Railway News: मध्य रेल्वेच्या परळ ते कुर्लादरम्यानचा ५ वी व ६ वी रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जमीन संपादन आणि प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. त्यामुळे चुनाभट्टी–कुर्ला आणि धारावी पट्ट्यातील स्वदेशी मिल येथे असलेल्या चाळींचे पाडकाम कारण्यासाठी मध्य रेल्वेने तयारी सुरू केली आहे.

परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
- महेश कोले
मुंबई - मध्य रेल्वेच्या परळ ते कुर्लादरम्यानचा ५ वी व ६ वी रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जमीन संपादन आणि प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. त्यामुळे चुनाभट्टी–कुर्ला आणि धारावी पट्ट्यातील स्वदेशी मिल येथे असलेल्या चाळींचे पाडकाम कारण्यासाठी मध्य रेल्वेने तयारी सुरू केली आहे. पाडकामासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि इतर व्यवस्था अंतिम टप्प्यात असून, सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि स्थानिक पोलिसांची (झोन ५) मदत घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीएसएमटी - कुर्लादरम्यान पाचव्या सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमईटीपी-२) अंतर्गत सुमारे २००८ मध्ये मंजूर करण्यात आला होता. प्रकल्पाचा मुख्य उद्देश उपनगरीय लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस व मालगाड्यांची वाहतूक वेगळी करणे हा होता. परळ - कुर्ला आणि कुर्ला-सीएसएमटी असा हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. दरम्यान अनेक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यापैकी कुर्ला - परळ मार्गासाठी अडथळा आता दूर झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानसूर कुर्ला - परळ दरम्यानच्या पहिल्या फेजमधील मार्गासाठी सध्या स्वदेशी मिल, कुर्ला आणि विद्याविहार येथील ५७०० चौरस मीटर जमीन संपादन प्रक्रिया २० जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे पूर्ण झाली आहे.
पात्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन पूर्ण, पर्यायी घरे दिली
या भागातील पात्र असलेल्या ७१४ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केले असून, त्यांना पर्यायी घरे देण्यात आली आहेत. सध्या त्यांचे स्थलांतर सुरू आहे. पात्र प्रकल्पबाधितांना धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये तसेच एमएमआरडीएच्या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत घरे देण्यात आली आहेत, तसेच या भागातील पाडकाम एका महिन्यात पूर्ण केले जाईल. त्यानंतर सायन येथील उड्डाणपुलासह सुरू असलेली कामे पूर्ण होताच प्रत्यक्ष रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू होईल.” विशेष म्हणजे, प्रभादेवी येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात आधीच ५वी-६वी मार्गासाठी तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे भविष्यात कोणताही अडथळा येणार असल्याचे ते म्हणाले.