मुंबईत तीन वर्षांमध्ये रेल्वे अपघातात ७,३४५ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 04:45 IST2026-03-06T04:45:28+5:302026-03-06T04:45:43+5:30
रेल्वेवरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षेसंबंधीच्या उपायांबाबत घोषणांव्यतिरिक्त, विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत.

मुंबईत तीन वर्षांमध्ये रेल्वे अपघातात ७,३४५ ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईची लाइफलाइन उपनगरीय रेल्वेमार्गांवरील अपघातांत गेल्या तीन वर्षांत ७,३४५ प्रवासी ठार झाले. याशिवाय अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे उघडकीस आले आहे. महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०२५-२६ या वर्षांचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालात विविध विषयांवरील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात उपनगरीय रेल्वे अपघातातील मृत्यूची माहिती दिली आहे.
रेल्वेवरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षेसंबंधीच्या उपायांबाबत घोषणांव्यतिरिक्त, विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामध्ये उपनगरीय रेल्वे मार्गांवरील अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी पादचारी पूल, भुयारी मार्ग व संरक्षण भिंतींचे बांधकाम, अनधिकृत प्रवेश ठिकाणे बंद करणे, रेल्वे खांबांचे स्थलांतर करणे तसेच इतर संबंधित उपायांचा समावेश आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघाती मृत्यू व जखमी व्यक्तींची आकडेवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांनी दिलेल्या आधारावर असल्याचे अहवालात म्हटले आहे.
यामुळे अनेकांचा मृत्यू
रेल्वे मार्गावरील अपघाती मृत्यू व जखमीची आकडेवारी प्रामुख्याने विजेचा धक्का लागून, आत्महत्या, नैसर्गिक मृत्यू, न्यायवैद्यकीय विश्लेषणासाठी संदर्भित केलेली प्रकरणे आदींच्या आधारे मुंबई लोहमार्ग पोलिस युक्तालयाकडून प्राप्त केली आहे.