छोट्या नाल्यांची ६४% सफाई; डेब्रिज, घरगुती कचरा, प्लास्टिकमुळे महापालिकेपुढे मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:11 IST2025-05-31T13:11:25+5:302025-05-31T13:11:40+5:30
रस्त्यांच्या कामातील डेब्रिज, वृक्ष छाटणी, रस्त्यावरील कचरा या नाल्यांमध्ये जमा झाला आहे

छोट्या नाल्यांची ६४% सफाई; डेब्रिज, घरगुती कचरा, प्लास्टिकमुळे महापालिकेपुढे मोठे आव्हान
मुंबई :मुंबईत सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईचे महापालिकेचे दावे वाहून गेले. नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार, ३१ मे रोजी डेडलाइन असतानाही आतापर्यंत मोठ्या नाल्यांची ९१ टक्के, तर छोट्या नाल्यांची ६४ टक्केच सफाई झाली आहे.
रस्त्यांच्या कामातील डेब्रिज, वृक्ष छाटणी, रस्त्यावरील कचरा या नाल्यांमध्ये जमा झाला आहे. शिवाय आधीच घरगुती कचरा, प्लास्टिक यामुळे छोटे नाले तुंबले असून, त्यांची सफाई करणे एक मोठी डोकेदुखी असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली.
पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर प्रत्येकी १० टक्के गाळ काढला जातो. मात्र नालेसफाईच्या डेडलाइनसाठी अवघे काही तास शिल्लक असताना आतापर्यंत एकूण ७४ टक्केच नालेसफाई झाली आहे. यात शहर, पश्चिम व पूर्व उपनगरे, मिठी नदी आणि छोट्या नाल्यांचा समावेश आहे. मिठी नदीची सफाई अवधी ५४ टक्के, तर छोट्या नाल्यांची ६४ टक्केच सफाई झाली आहे.
दुसरीकडे सोमवारी आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरांत झालेल्या जोरदार पावसामुळे छोट्या नाल्यांच्या सफाईत अडथळे निर्माण झाले आहेत. रस्ते, नाले यांच्याकडेला साफ केलेला कचरा तसेच उपसलेला गाळ पुन्हा नाल्यात गेला आहे. परिणामी छोट्या नाल्यांची सफाई वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
'श्वेतपत्रिका काढा'
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या कामाच्या पाहणीनंतर नाराजी व्यक्त करताना या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील नाल्यांची पातमुखे ही भरती रेषेच्या खाली आहेत. त्यामुळे भरती आल्यानंतर सगळे पाणी जलवाहिन्यातून बाहेर रस्त्यावर फेकले जाते, परिणामी त्या भागात पाणी तुंबते. यावर पालिकेने काय उपाययोजना केल्या? किती पातमुखांची उंची वाढवून गेल्या २० वर्षांत ती वर आणली याची माहिती त्यांनी पालिकेकडे मागितली आहे.
घनकचरा विभागाचा मदतीचा हात
छोट्या नाल्यांची सफाई लवकर व्हावी, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे पावसाळ्यात नदी, नाल्यांच्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील टाकाऊ वस्तूंचे संकलन, राडारोडा उचलणे, सर्वकष स्वच्छता केली जाणार आहे.