पालिकेत ५५ टक्के नवीन सदस्य, नागरी समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी अनुभवी नगरसेवक, नेत्यांचे मार्गदर्शन ठरणार मोलाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:04 IST2026-01-30T13:04:33+5:302026-01-30T13:04:45+5:30
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांत ५५ टक्क्यांहून अधिक नगरसेवक प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी सभागृहात निम्म्यापेक्षा जास्त नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सभागृहातील अनुभवी नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली तरुण आणि सुशिक्षित नगरसेवक मुंबईच्या नागरी समस्या कशा सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

पालिकेत ५५ टक्के नवीन सदस्य, नागरी समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी अनुभवी नगरसेवक, नेत्यांचे मार्गदर्शन ठरणार मोलाचे
मुंबई - महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांत ५५ टक्क्यांहून अधिक नगरसेवक प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी सभागृहात निम्म्यापेक्षा जास्त नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सभागृहातील अनुभवी नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली तरुण आणि सुशिक्षित नगरसेवक मुंबईच्या नागरी समस्या कशा सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी अनेक नवीन उमेदवारांना संधी दिली होती. भाजपच्या निवडून आलेल्या ८९ पैकी ४३ नगरसेवक (४८ टक्के) हे नवखे आहेत. तर, उद्धवसेनेच्या ६५ नगरसेवकांपैकी ३८ जण (५८ टक्के) हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. काही नवनिवार्चित सदस्य हे माजी नगरसेवकांचे नातेवाईक आहेत.
नवीन नगरसेवकांकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालयांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तरुण नगरसेवक आपली कल्पकता वापरून प्रशासनाला उत्तरदायी बनवू शकतील. त्यांच्याकडे तळागाळात काम करणारी एक सक्षम टीम तयार आहे, असे काही ज्येष्ठ नगरसेवकांनी सांगितले.
पालिका प्रशासनाशी थेट संवादावर अधिक भर
- गेली काही वर्षे पालिकेत प्रशासकीय राजवट होती. आता लोकप्रतिनिधी निवडून आल्याने विविधसुविधा, वाहतूककोंडी आणि स्वच्छता यांसारखे प्रश्न, समस्या सोडविण्यात पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे. नवीन नगरसेवक वॉर्डातील कामासंदर्भात अधिकाऱ्यांशी समन्वय साधून समस्या सोडविण्यावर भर देतील, त्यामुळे प्रशासनालाही स्थानिक प्रश्न थेट समजून घेता येतील.
-नगरसेवकांअभावी मधल्या काळात वॉर्ड अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील लहान-मोठ्या समस्या समजून घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे संबंधितांकडून प्रस्ताव आल्यानंतरच कामे हाती घेतली जात होती. शिवाय निधी वाटपात भेदभाव होत असल्याच्या तक्रारीही होत्या. आता नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद असणार आहे.
- कामकाज समजण्यासाठी लागतात सहा महिने आरक्षणामुळे दर पाच वर्षांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नवे नगरसेवक निवडून येतात. पालिकेचे कामकाज समजून घ्यायला त्यांना साधारणपणे सहा महिने लागतात. त्यांना ज्येष्ठ नगरसेवक आणि मतदारसंघातील आमदार मार्गदर्शन करतात, असे ज्येष्ठ नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.