मुंबई - नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता या महामार्गाचा संपूर्ण ७०१ कि.मी. मार्ग सुरू झाला. शुक्रवारी या मार्गावरून ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला; तर समृद्धी महामार्ग सुरू होतो त्या ठाण्यातील आमने येथून ४,४७६ वाहनांनी प्रवास केला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासांत पूर्ण करण्यासाठी सुमारे ६१ हजार कोटी खर्चून प्रवेश नियंत्रित असा समृद्धी महामार्ग बांधला. या महामार्गाची लांबी ७०१ कि.मी. असून त्यातील नागपूर ते इगतपुरी हा ६२५ कि.मी. लांबीचा मार्ग यापूर्वीच सेवेत दाखल झाला होता; तर इगतपुरी ते आमने हा ७६ कि.मी.च्या मार्गाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६ नंतर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला. त्या दिवशी इगतपुरी ते आमने असा ३०५ वाहनांनी प्रवास केला होता. मात्र शुक्रवारी हा आकडा वाढून ४,४७६ वाहनांपर्यंत पोहोचला. येत्या काळात यात आणखी वाढीची शक्यता आहे.
समृद्धीवरून २ कोटींहून अधिक वाहनांचा प्रवास समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रवाशांच्या सेवेत आला. तेव्हापासून ३ जून २०२५ पर्यंत या महामार्गावरून २ कोटी १२ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. त्यातून एमएसआरडीसीला आतापर्यंत १३३५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सद्य:स्थितीत या महामार्गावरून दरमहा सरासरी ३३ हजार वाहनांकडून प्रवास केला जात आहे. आता शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर लवकरच ही संख्या ५० हजारांपुढे जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
किती वाहने धावली?सप्टेंबर २०२४ ७,६३,७६२ऑक्टोबर २०२४ ७,८५,२५६नोव्हेंबर २०२४ ९,१४,४४१डिसेंबर २०२४ १०,००,६५९जानेवारी २०२५ ९,६७,७२२फेब्रुवारी २०२५ १०,४२,१७१मार्च २०२५ ९,४३,८२०एप्रिल २०२५ ९,०६,१२३मे २०२५ १०,५४,१८३