Join us

फटाक्यांमुळे ३५ आगी; सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 09:53 IST

१० आणि ११ नोव्हेंबरला प्रत्येकी चार मिळून आठ घटनांची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली.

मुंबई : फटाक्यांमुळे मागील तीन दिवसांत मुंबईत ठिकठिकाणी ३५ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या आगीत मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. फक्त एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली. 

१० आणि ११ नोव्हेंबरला प्रत्येकी चार मिळून आठ घटनांची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. पहिले दोन दिवस हे प्रमाण कमी होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले गेले. या एका दिवसात तब्ब्ल २७ कॉल अग्निशमन दलाला आले. सर्व कॉल फटाक्यांमुळे लागलेल्या आगीबाबत होते. 

वेळ संपून गेल्यानंतरही फटाके फोडले

दिवाळीत फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे अग्निशमन दल या कालावधीत आणखी सतर्क होते. मंगळवारी, भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाके फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या वतीने आणखी खबरदारी घेतली जाणार आहे. मुंबई आणि महानगर प्रदेशात रात्री आठ ते दहा या वेळेतच फटके फोडण्याचे बंधन सर्वोच्च न्यायालयाने घातले आहे. मात्र, वेळ संपून गेल्यानंतरही फटाके फोडले जात आहेत.

टॅग्स :फटाकेमुंबई