मुंबई - महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक आहे. 33 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. या वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते असा आरोप अभिनेता सयाजी शिंदे यांनी सरकारवर केला होता. शिंदेंच्या या आरोपाला उत्तर देताना, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्षलागवड हा सरकारचा उपक्रम नसून स्वयंप्रेरणेनं आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ असल्याचं मुनगंटीवर यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोतांड; अभिनेता सयाजी शिंदेंनी सरकारवर केला गंभीर आरोप
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला, त्यावर टीका करत सयाजी शिंदे म्हणाले की, मोजक्याच ग्रामपंचायती झाडं लावण्याचा उपक्रम करतात. 3 हजार 300 झाडे किती ग्रामपंचायतीने लावलेत? 33 कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे? पाणी आणणार कुठून? दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगविण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली. तसेच वृक्षांमध्ये 250 जाती आहेत. नगरपालिका शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडं लावली जातात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणतं झाड लावलं पाहिजे याची माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक आहे. असा संताप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यावर, सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.