मुंबई - भारत कोरोना संसर्ग असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांवर गेली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेणे हे त्यांच्या आणि परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य, त्यांची सध्याची मानसिकता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्र लिहिले आहे. तर, शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी कर्नाटकचा दाखला देत केंद्र सरकाराला प्रश्न विचारला आहे.
देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 7 लाखांच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 18 हजारांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमध्ये, परीक्षा दिल्यानंतर तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कर्नाटकमधील 32 विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोरोनाची लागण झाल्याची बातमी शेअर केली आहे. तसेच, कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार असूनही देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या जावाची परीक्षा भाजपा का घेतंय? असा प्रश्न वरुण यांनी विचारला आहे. तसेच, केंद्र सरकारच्या निर्णयालाही त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.