वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोडचे ३० टक्के काम पूर्ण, कामाला आणखी गती देण्याचे फडणवीसांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:53 IST2026-02-19T17:52:25+5:302026-02-19T17:53:31+5:30
पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे गेल्या सात वर्षात केवळ ३० टक्केच काम झाले आहे.

वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोडचे ३० टक्के काम पूर्ण, कामाला आणखी गती देण्याचे फडणवीसांचे निर्देश
पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे गेल्या सात वर्षात केवळ ३० टक्केच काम झाले आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MMRDC) कंत्राटदाराला मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री वाढवून कामांना गती देण्यास सांगितले आहे.
MSRDC ने १७.७ किलोमीटर लांबीच्या सी लिंक उभारणीचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सागरी मार्गावर एकूण ८ मार्गिका बांधला जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किलोमीटर लांबीचा असून तो समुद्रात ९००० मीटर आतमध्ये उभारला जाईल. सद्य:स्थितीत प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. MSRDC ने समुद्रातील पुलाच्या उभारणीच्या कामाला गती दिली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे रखडले प्रकल्पाचे काम
१. या प्रकल्पाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे प्रकल्पाचे काम थांबले होते. त्यातच या प्रकल्पाचा कंत्राटदार असलेला रिलायन्स इन्फ्रा आर्थिक गर्तेत सापडला.
२. प्रकल्पाचे काम थांबले होते. त्यानंतर अपको इन्फ्राटेक आणि वी बिल्ट यांनी २०२२ मध्ये कामाला सुरुवात केली. गेल्या चार वर्षात प्रकल्पाचे काम केवळ ३० टक्केच पूर्ण होऊ शकले आहे. त्यामुळे आता कंत्राटदाराला कामाची गती वाढविण्यासाठी यंत्रणा आणि मनुष्यबळ अधिक लावण्याचे निर्देश दिल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कामातील अडथळे संपले, पावसाळ्यापूर्वी कामे पूर्णत्वास
वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामातील अडथळे आता जवळपास संपले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांना गती दिली जात आहे. त्यानुसार गेल्यावर्षी या प्रकल्पाच्या कामासाठी १६ बार्जेस काम करत होते. यंदा ही संख्या वाढवून ३२ करण्यात आली आहे.
तसेच आता समुद्रात मे महिन्याच्या मध्यापर्यंतच काम करता येणार आहे. त्यानंतर पावसाळ्यात समुद्रातील कामे थांबतात. मात्र, पावसाळा संपताच या बार्जेसमध्ये आणखी वाढ करुन कामे जलदगतीने पूर्ण केली जातील असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.