लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपल्यामध्ये असलेली एकजूट एकदा तुटली तर लचके तोडण्यास शत्रू मोकळे असतात. त्यामुळे हे संकट परतवून लावले असले तरी सतर्क राहा, असा सल्ला उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला. तुर्कीच्या ‘सेलेबी’ कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द केल्यामुळे ३,७०० कामगारांची नोकरी जाणार होती. मात्र, संघटनेच्या प्रयत्नामुळे त्यांना इंडो-थाई कंपनीत सामावून घेण्यात आले. या कामगारांनी संघटनेच्या नेत्यांसह गुरुवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत समाधान व्यक्त केले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कामगारांचा विश्वासघात होणार नाही. संकटाच्या वेळी धावून येणार नसू, तर आमची गरजच काय? सरकारने बंदी घातल्यानंतर ती तुर्कीची कंपनी असल्याचे समजले. नवीन कंपनी आली तरी करार कोण करते? ती आणण्याची परवानगी कोण देते? हेच लोक करार करतात, अशी टीका ठाकरे यांनी केली.