Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमान कंपन्यांच्या ताफ्यात दाखल होणार १,५०० नवी विमाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 12:46 IST

मुंबई : देशात विमानतळांची वाढती संख्या आणि त्यामुळे प्रवासी संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्या नव्या विमानांच्या ...

मुंबई : देशात विमानतळांची वाढती संख्या आणि त्यामुळे प्रवासी संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्या नव्या विमानांच्या खरेदीवर जोर देत आहेत. येत्या काही वर्षांत १५०० नवीन विमाने दाखल होणार आहेत. यातील बहुतांश विमाने ही देशांतर्गत उड्डाण करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

सद्य:स्थिती काय आहे   सध्या देशामध्ये विमानतळ आणि धावपट्ट्या यांची एकूण संख्या ४८७ इतकी आहे.  गेल्या दहा वर्षांत देशात ७५ नव्या विमानतळांची बांधणी झाली आहे.   अनेक नव्या शहरांची जोडणी झाली आहे. परिणामी, प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच नव्या विमानांची खरेदी करण्यात येत आहे. 

किमती भिडल्या गगनाला देशात सध्या ७५० विमाने आहेत. मात्र, यापैकी २०० विमाने तांत्रिक दोषांमुळे जमिनीवरच आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यामुळे विमान तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 

२०३० पर्यंत दोन हजार विमाने येणार ताफ्यात गेल्या वर्षी विमान कंपन्यांकडून विमानांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये अकासा एअर, एअर इंडिया आणि इंडिगो या देशातील तीन प्रमुख कंपन्यांनी एकूण ११२० विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.  अन्य काही लहान-मोठ्या कंपन्यांनी देखील ३००च्या आसपास नव्या विमान खरेदी केली आहे. यापैकी काही विमाने टप्प्या-टप्प्याने या विमान कंपन्यांच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.   २०३० पर्यंत भारतीय विमान कंपन्यांकडून किमान दोन हजार नव्या विमानांची खरेदी होणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :विमानमुंबई