नायगावच्या बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील दीडशे कुटुंबीयांनी घेतला स्वप्नातल्या घराचा ताबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:14 IST2026-03-21T13:14:04+5:302026-03-21T13:14:36+5:30
दादर पूर्वेकडील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी कुटुंबाकडून घराचा ताबा घेण्यासाठी म्हाडा कार्यालयात रीघ लागली असून, गेल्या तीन दिवसांत जवळपास १५० कुटुंबांनी आपल्या घराचे ताबा प्रमाणपत्र घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नायगावच्या बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील दीडशे कुटुंबीयांनी घेतला स्वप्नातल्या घराचा ताबा
मुंबई : बीडीडी चाळ १-बी मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पाटणेकर कुटुंबियांना टी-७ या टॉवरमध्ये १७ व्या मजल्यावर घर मिळाले आहे. शुक्रवारी स्वप्नातल्या घराची चावी हातात पडताच त्यांना ‘आकाश ठेंगणे’ झाल्यासारखे वाटले. ‘आनंद शब्दांत व्यक्त करता येणे कठीण असल्याचे राजू पाटणेकर यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
दादर पूर्वेकडील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी कुटुंबाकडून घराचा ताबा घेण्यासाठी म्हाडा कार्यालयात रीघ लागली असून, गेल्या तीन दिवसांत जवळपास १५० कुटुंबांनी आपल्या घराचे ताबा प्रमाणपत्र घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
१६ मार्चला यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ८६४ पैकी १४ कुटुंबांना प्रातिनिधिक स्वरूपात चावीचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील २२-२३ मजली पाच इमारती बांधून पूर्ण झाल्या असून, १८० चौ. फुटाच्या घरात राहणाऱ्या ८६४ कुटुंबांना ५०० चौ. फुटाची घरे मिळणार आहेत.
२३ मजल्यांचे २० टॉवर्स -
नायगावमध्ये एकूण ४२ बीडीडी चाळी असून, त्यातील ३,३४४ भाडेकरूंचे २३ मजली २० टॉवर्समध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. यातील ५ टॉवर्सचे बांधकाम पूर्ण झाले असून, आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नव्या घरात पूजन -
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवारी १५ ते १७ कुटुंबांनी आपल्या नव्या घरात पूजा केल्याचे काहींनी सांगितले. गेले तीन दिवस बीडीडीवासीयांनी नव्या घराचा ताबा घेण्यासाठी म्हाडा कार्यालयात रीघ लावली असून, कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी जोमाने सुरू आहे.
१८० मधून थेट ५०० चौ फुटांच्या घरात जाणार आहोत, हे खरेच स्वप्नवत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, खरे तर गुढीपाडव्याला नव्या घरात पूजा करण्याची इच्छा होती; पण काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे बाकी होते; पण हरकत नाही, आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरात पूजा करणार असल्याचे पाटणेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.