१३,९८४ गावांची पाणी पातळी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 06:49 IST2018-10-21T06:48:33+5:302018-10-21T06:49:15+5:30

राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राज्यात केलेल्या सर्वेक्षणात १३ हजार ९८४ गावांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याचे उघड झाले आहे.

13,984 water level of villages decreased | १३,९८४ गावांची पाणी पातळी घटली

१३,९८४ गावांची पाणी पातळी घटली

मुंबई : राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राज्यात केलेल्या सर्वेक्षणात १३ हजार ९८४ गावांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याचे उघड झाले आहे. तब्बल २५२ तालुक्यांमधील पाणी पातळीची स्थिती चिंताजनक आहे.
सर्वेक्षणावेळी ३५३ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यांतील १३ हजार ९८४ गावांमधील पाण्याच्या पातळीत ५ वर्षांच्या तुलनेत १ मीटरहून जास्त घट झाल्याचे दिसून आले. यापैकी ३ हजार ३४२ गावांमध्ये ३ मीटरपेक्षा तर ३ हजार ४३० गावांमध्ये २ ते ३ मीटरपेक्षा अधिक घट झाली. ७ हजार २१२ गावांमध्ये १ ते २ मीटर पाण्याच्या पातळीत घट झाली.
हे सर्वेक्षण सप्टेंबरअखेरीस केले. त्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाकडे सादर झाला आहे. या १३,९८४ गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची स्थिती सामान्य असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र घट झाली आहे.
>चौकशी करा : काँग्रेस
जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात कामे केल्याचा दावा राज्य सरकार करीत असताना दुसरीकडे एवढी भीषण दुष्काळी परिस्थिती कशी निर्माण झाली, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. जलयुक्त शिवार योजनेचा पैसा कुठे मुरला, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: 13,984 water level of villages decreased