मुंबई - अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ज्यांचे प्रवेश अर्ज अपूर्ण असतील त्यांना पाचही प्रवेश फेरीत नोंदणी करता येणार आहे. तसेच महाविद्यालयाचा पसंतीक्रमही भरता येणार आहे. सीबीएसई तत्सम मंडळांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत जर एटीकेटी सवलत लागू असेल तर त्याच मंडळाच्या महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एटीकेटी लागू असेल. अर्थात राज्य मंडळाची एटीकेटी अन्य मंडळांच्या शाळांसाठी लागू नसेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले आहे.
राज्यात जवळपास ९५ हजार कनिष्ठ महाविद्यालयांसाठी १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील १२,०५,००० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक पूर्ण केला आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांचा भाग दोन राहिलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीच्या पाचही टप्प्यांवर नोंदणी आणि महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरता येणार आहे. सीबीएसई किंवा आयजीएसई या मंडळाच्या शाळांमध्ये जर एटीकेटी सवलत लागू असेल तर तेथे अकरावी प्रवेश त्याच मंडळाच्या महाविद्यालयात मिळू शकेल.
असा करता येईल अर्जअकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी प्रत्येक फेरीपूर्वी संधी दिली जाणार. ज्या विद्यार्थ्यांचा पार्ट एकचे दोन अर्ज भरणे बाकी असेल त्यांना विद्यमान प्रवेशफेरी संपल्यानंतर पुढील फेरीच्या सुरुवातीस अर्ज करता येणार.यावेळी नवीन विद्यार्थीसुद्धा अर्ज भरून प्रवेश फेरीत येऊ शकतील.
त्यांना विज्ञानमध्ये हवे ४० टक्के गुण राज्य मंडळाच्या ज्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलत असेल, त्यांना अकरावीसाठी शासनाने सवलत लागू केली आहे. मात्र एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये जर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल, तर दहावीमध्ये त्यांना विज्ञान विषयात ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे संचालक श्रीराम पानझडे यांनी दिली.