मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मुंबईमेट्रो १ मार्गिकेला ११ वर्षे पूर्ण होत असून, या कालावधीत या मेट्रो मार्गिकेवरून १११ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रोच्या १६ गाड्यांच्या माध्यमातून १२ लाख ६६ हजार फेऱ्यांमधून प्रवाशांनी हा प्रवास केला आहे.
या मेट्रोने आतापर्यंतची सर्वाधिक पाच लाख ४७ हजार प्रवासी संख्येचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो वन (एमएमओपीएल)कडून देण्यात आली. मेट्रो वन मार्गिका ८ जून २०१४ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. रविवार, ८ जूनला या मार्गिकेला ११ वर्षे पूर्ण होत आहेत.
रिलायन्स इन्फ्राने पीपीपी तत्त्वावर या मेट्रो मार्गिकेची उभारणी केली होती. या मेट्रोमध्ये रिलायन्सची ७४ टक्के, तर एमएमआरडीएची २६ टक्के भागीदारी आहे. सध्या या मेट्रो मार्गिकेवरून दरदिवशी सरासरी पाच लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
घाटकोपर स्थानकातून २९ कोटी प्रवाशांची ये-जा मेट्रो १ मार्गिकेवर घोटकोपर स्थानकातून सर्वाधिक २९ कोटी तीन लाख प्रवाशांनी आतापर्यंत प्रवास केला आहे. त्याखालोखाल अंधेरी स्थानकातून २३ कोटी, साकीनाका ११ कोटी, मरोळ नाका नऊ कोटी, चकाला सात कोटी ८० लाख, पश्चिम द्रुतगती मार्ग सहा कोटी सहा लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. सर्वांत कमी प्रवासी जागृती नगर मेट्रो स्थानकात लाभले असून येथून, आतापर्यंत एक कोटी ८० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
मेट्रो वन मधून प्रति दिन सहा लाख - ५० हजार प्रवासी प्रवास करतील, असे अपेक्षित होते. मात्र, ही अपेक्षित संख्या अद्याप गाठता आलेली नाही. - मेट्रो वनच्या सर्व गाड्यांनी आतापर्यंत एक कोटी ४५ लाख किलोमीटरचा टप्पा गाठला आहे.