Join us

कोडी उलगडणार?

By admin | Updated: April 30, 2017 03:30 IST

एका मालिकेत सध्या भोसले वाड्यावर असलेल्या भुताच्या शोधात शांभवी आहे. निर्मला शांभवीच्या मार्गात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे.

एका मालिकेत सध्या भोसले वाड्यावर असलेल्या भुताच्या शोधात शांभवी आहे. निर्मला शांभवीच्या मार्गात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. शांभवीला वाड्यातील भुताबद्दल कळले तर ती सर्जापासून कायमची दूर होईल, अशी भीती निर्मलाच्या मनात आहे. म्हणूनच निर्मलाने शांभवीला चकवा देण्यासाठी भोसले वाड्यामध्ये स्नेहा हे लहान भूत आणले होते. पण आता निर्मला तिनेच रचलेल्या खेळामध्ये पुरती अडकली आहे. कारण स्नेहा वाड्यातून बाहेर पडल्यामुळे निर्मलाच्या सगळ्या शक्ती निघून गेल्या आहेत आणि हे तिला वाड्यात आल्यावर कळले आहे. निर्मला आता चांगलीच संतापली आहे. तसेच, भानुमतीने तिला दिलेल्या नकारामुळे निर्मला वाईट शक्तींच्या मार्गावर गेली आहे. वाईट शक्तींच्या मदतीने तिच्या शक्ती तिने परत मिळाल्या आहेत. पण त्या बदल्यात आता तिला महादेवचा बळी द्यावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना स्नेहा शांभवीला वाड्यामध्ये कोणाचा तरी खून झाला आहे, हे एका वेगळ्याच पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे आता शांभवी वाड्यामध्ये कोणाचा खून झाला आहे हे शोधणार आहे. या सगळ्या अघटित घटना घडत असतानाच आता वाड्यावर बबन्या आल्याने नवे वळण येणार आहे. बबन्याला शांभवी वाड्यावर घेऊन आली असून, त्याला पाहून वाड्यातील सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. पण सर्जा मात्र खूश आहे. कारण आता निर्मला कुठे आहे हे नक्कीच कळेल, अशी त्याला खात्री आहे. परंतु, लवकरच बबन्या निर्मलाचा खून झाला असल्याचे शांभवीला सांगणार आहे. निर्मलाच्या रचलेल्या सापळ्यात बबन्या आणि शांभवी पुरते अडकले असून, सर्जासमोर शांभवी खोट्यात पडणार आहे का, हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.