Join us  

तुला पाहते रे मध्ये ईशा करणार विक्रांतचा खून?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 3:42 PM

विक्रांतचे खरे रूप कळल्यानंतर आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांना लागली आहे. या मालिकेत आता पुढे काय होणार आहे याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही कथा खरी आहे की खोटी हे केवळ आपल्याला तुला पाहाते रे या मालिकेची टीमच सांगू शकते. पण ही कथा खरी आहे की नाही हे प्रेक्षकांना कळण्यासाठी त्यांना या मालिकेचे पुढचे भाग पाहावे लागतील.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विक्रांत सरंजामे आणि ईशाची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली आणि अल्पावधीतच 'तुला पाहते रे' ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच भावत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी या मालिकेत प्रेक्षकांना एक ट्वीस्ट पाहायला मिळाला. विक्रांतचे खरे रूप प्रेक्षकांना कळले असून त्याने ईशाशी लग्न का केले हे देखील आता प्रेक्षकांसमोर उघड झाले आहे.

विक्रांतचे खरे रूप कळल्यानंतर आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांना लागली आहे. या मालिकेत आता पुढे काय होणार आहे याविषयी अनेक तर्क वितर्क प्रेक्षक लावत आहेत. त्याचसोबत सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट फिरत असून याविषयी राजश्री मराठीने वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या कथेनुसार राजनंदिनी ही जालिंदरची बहीण असून विक्रांतच्या संपत्तीवर तिचा डोळा असल्याने जालिंदरने तिचे विक्रांतसोबत लग्न लावून दिले होते. मात्र विक्रांत हा संरजामेंचा दत्तक मुलगा असल्याने सरंजामे कुटुंबियांचा विश्वास जिंकण्यासाठी तो संपत्ती आपल्या नावावर करत नाही. पण ही संपत्ती मी लवकरच राजनंदिनीच्या नावावर करेन असे तो जालिंदरला सांगतो. पण राजनंदिनीच्या अकाली मृत्यमुळे त्यांचा हा डाव फसतो. त्याचदरम्यान इशाचा जन्म होता. इशाचा जन्म झाल्यानंतर तिच्यावर काही चुकीचे औषधोपचार करण्यात आल्याने तिचे डोळे जातात. त्यावेळी राजनंदिनीने दान केलेल्या डोळ्यांमुळे ईशाला दृष्टी मिळते. कालांतराने ईशा आणि विक्रांतची भेट होते आणि तो तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतो. मात्र या सगळ्यात जालिंदर विक्रांतचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणतो. त्यावर विक्रांतला आपली चूक कळते आणि तो ईशाची माफी मागतो. मात्र ईशाच्या मनात सूडाची भावना निर्माण झाल्याने ती विक्रांतचा खून करते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही कथा खरी आहे की खोटी हे केवळ आपल्याला तुला पाहाते रे या मालिकेची टीमच सांगू शकते. पण ही कथा खरी आहे की नाही हे प्रेक्षकांना कळण्यासाठी त्यांना या मालिकेचे पुढचे भाग पाहावे लागतील.

टॅग्स :तुला पाहते रेझी मराठी