Join us  

'श्रीमद् रामायण'मध्ये हा बालकलाकार निभावणार बाल हनुमानाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 5:44 PM

Shrimad Ramayana : 'श्रीमद् रामायण' या मालिकेत माता सीतेचा शोध घेण्याचे मोठे कठीण काम सुरू झाले आहे आणि हनुमानाने आपल्या वानरसेनेसह लंकेच्या दिशेने कूच केली आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील श्रीमद् रामायण (Shrimad Ramayana) या मालिकेत माता सीतेचा शोध घेण्याचे मोठे कठीण काम सुरू झाले आहे आणि हनुमानाने आपल्या वानरसेनेसह लंकेच्या दिशेने कूच केली आहे. या प्रवासात समुद्र त्यांना आडवा येतो आणि त्यामुळे ही सेना गर्भगळीत होऊ लागते. कारण समुद्र कसा ओलांडायचा हे त्यांना कळत नाही. अशा संकट समयी जांबुवंत हनुमानासमक्ष येतो आणि त्याला त्याच्या जन्माची तसेच त्याच्यात असलेल्या महान शक्तींची आठवण करून देतो. हनुमानाच्या या शक्तीच त्यांना लंकेत सीतेचा शोध घेण्यास कामी येतील असे जांबुवंत त्याला सांगतो.  अंजनी आणि केसरी यांच्या पोटी जन्मलेल्या हनुमानात असामान्य शक्ती असतात पण बालपणी तो फारच खोडकर आणि मस्तीखोर असतो. एकदा मित्रांसोबत खेळत असताना त्याला एक लाल रंगाचा तेजाचा गोळा दिसतो. ते फळ आहे असे समजून हनुमान त्या फळाकडे झेप घेतो पण प्रत्यक्षात ते फळ नसून सूर्य असतो. लहानपणी नकळत हनुमानाने आपल्या शक्तींचा दुरुपयोग केलेला असतो. त्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला असतो की जोपर्यंत कुणी त्याला स्मरण देणार नाही, तोपर्यंत त्याची शक्ती तो विसरून जाईल. देवाने त्याला राम भक्तीचे वरदान देखील दिले असते. 

अब्दुल करीम हा बाल कलाकार या मालिकेत बाल हनुमानाची भूमिका करत आहे. बाल हनुमानाचा खोडकरपणा आणि त्याची निरागसता तो आपल्या अभिनयातून सुंदर पद्धतीने दाखवेल. निर्भय वाधवा म्हणतो की, श्रीमद् रामायण मालिकेत बाल हनुमानाचे कथानक लक्षणीय आहे. त्यात केवळ हनुमानाच्या बालपणीच्या खोड्या दाखवलेल्या नाहीत, तर त्याच्यातील दिव्यत्वाचे दर्शन घडवले आहे. तो श्रेष्ठ रामभक्त का आहे हे दाखवण्यात आले आहे. या कथानकातून आपण हनुमानाच्या बालपणीच्या विश्वात पोहोचतो. या बालपणात निरागसता आणि अमर्याद शक्ती यांचा मिलाफ झालेला दिसतो. त्याच्या बालपणीच्या प्रवासात त्याच्या शक्ती लुप्त होताना दिसतात पण त्याचबरोबर त्याच्यात आलेली विनम्रता आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी असलेली त्याची अपार भक्ती दिसते. या कथानकातून हा बोध आपल्याला मिळतो की, अविचल धैर्य हे केवळ शारीरिक क्षमतेतून येत नाही, तर ते आत्म्याच्या शुद्धतेतून येते! हनुमान जयंती महासप्ताह २३ एप्रिल पासून श्रीमद् रामायण मालिकेत रात्री ९ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळेल.