Join us  

'रामायण'च्या निर्मात्यांवर दाखल झाली होती केस, १० वर्षं माराव्या लागल्या होत्या कोर्टाच्या चकरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 6:00 AM

रामायण मालिकेतील एका संदर्भामुळे वाद निर्माण झाला होता.

ठळक मुद्देलोकांना लव आणि कुशची कथा पाहाण्यात रस असला तरी ती कथा दाखवल्यास ती काल्पनिक वाटू शकेल अशी भीती रामानंद सागर यांना वाटत होती. पण तरीही लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी ही कथा दाखवण्याचा निर्णय घेतला. पण ही कथा दाखवल्यानंतर अनेक लोकांनी यावर आक्षेप घेतला.

रामायण या मालिकेला ऐंशीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ही मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण या कार्यक्रमांची आठवण आली होती.

रामायण या मालिकेचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करता ही मालिका आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रामायण या मालिकेमुळे रामानंद सागर यांच्याविरोधात एक केस दाखल झाली होती आणि ही केस जवळजवळ 10 वर्षं सुरू होती. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेचे ७८ भाग पूर्ण झाल्यानंतर या मालिकेची कथा संपायला आली होती. पण तरीही निर्मात्यांनी लव आणि कुशची कथा दाखवावी अशी मागणी लोकांनी केली होती. लोकांना लव आणि कुशची कथा पाहाण्यात रस असला तरी ती कथा दाखवल्यास ती काल्पनिक वाटू शकेल अशी भीती रामानंद सागर यांना वाटत होती. पण तरीही लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी ही कथा दाखवण्याचा निर्णय घेतला. पण ही कथा मालिकेत दाखवल्यानंतर अनेक लोकांनी यावर आक्षेप घेतला. तसेच अनेक वाद निर्माण झाले. रामानंद सागर यांच्याविरोधात केस देखील दाखल झाली होती. ही केस जवळजवळ १० वर्षं सुरू होती.    

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात काहीच दिवसांपूर्वी रामायण या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. रामायण या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाल्यावर या भूमिकेपासून दूर जाणे आणि काही नवीन करणे कठीण होते का असे विचारले असता रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी या कार्यक्रमात सांगितले होते की, “रामायणात काम केल्यानंतर मला चित्रपटात योग्य अशा भूमिका मिळत नव्हत्या. त्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. पण काही दिवसांनी मी सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना भेटलो. ते जंजीर, लावारिस, नमक हलाल, मुकद्दर का सिकंदर यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी मला एखादी मोठी भूमिका न देण्यामागील कारण सांगितले. ते म्हणाले होते की, मी तुला एखादी मोठी भूमिका देऊ शकत नाही...कारण तू अजूनही तुझ्या श्रीरामाच्या व्यक्तिरेखेसाठीच ओळखला जात आहेस आणि ती प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही. त्यानंतर मी माझी प्रतिमा पुसण्याचे अनेक प्रयत्न केले. काही चित्रपट आणि मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या. पण तरीही तब्बल तीन दशकांनंतर देखील माझी श्रीरामाची प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही.

टॅग्स :रामायण