Join us  

लॉकडाऊनमुळे पुन्हा सुरू होणार आहेत रामायण, महाभारत या मालिका?

By पंढरीनाथ कुंभार | Published: March 26, 2020 10:04 AM

एकेकाळी गाजलेल्या या दोन्ही पौराणिक मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सध्या सोशल मीडियावर होत आहे.

ठळक मुद्देरामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सध्या सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करता या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होऊ शकतात असा अंदाज लावला जात आहे.

रामायण आणि महाभारत या मालिकांना नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची आठवण आली आहे.

रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सध्या सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करता या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होऊ शकतात असा अंदाज लावला जात आहे. प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी सध्या या मालिकेच्या हक्कांबाबत आमची चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात काहीच दिवसांपूर्वी रामायण या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. रामायण या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाल्यावर या भूमिकेपासून दूर जाणे आणि काही नवीन करणे कठीण होते का असे विचारले असता रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी या कार्यक्रमात सांगितले होते की, “रामायणात काम केल्यानंतर मला चित्रपटात योग्य अशा भूमिका मिळत नव्हत्या. त्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. पण काही दिवसांनी मी सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना भेटलो. ते जंजीर, लावारिस, नमक हलाल, मुकद्दर का सिकंदर यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी मला एखादी मोठी भूमिका न देण्यामागील कारण सांगितले. ते म्हणाले होते की, मी तुला एखादी मोठी भूमिका देऊ शकत नाही... कारण तू अजूनही तुझ्या श्रीरामाच्या व्यक्तिरेखेसाठीच ओळखला जात आहेस आणि ती प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही. त्यानंतर मी माझी प्रतिमा पुसण्याचे अनेक प्रयत्न केले. काही चित्रपट आणि मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या. पण तरीही तब्बल तीन दशकांनंतर देखील माझी श्रीरामाची प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही.

या कार्यक्रमात पुढे अरुण गोविल यांनी सांगितले होते की, रामायण मालिकेच्या अपार लोकप्रियतेनंतर त्यांना अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले जायचे. अशाच एका पार्टीत त्यांनी काही मोठमोठ्या अभिनेत्यांना त्यांच्याकडे आदराने बघत असल्याचे पाहिले. या कलाकारांमध्ये श्रीदेवी आणि जयाप्रदा या दोघीही होत्या. त्यांनी हात जोडून अरुण गोविल यांचे स्वागत केले होते. रामायण मालिकेमुळे त्यांना मिळालेला हा सन्मान होता.

टॅग्स :रामायण