Join us  

थाटात रंगणार कृष्णा आणि राया यांचा विवाहसोहळा, पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 3:26 PM

'मन झालं बाजिंद' या मालिकेत राया आणि कृष्णा यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'मन झालं बाजिंद' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोसस प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मन झालं बाजींद या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेत कृष्णा आणि राया या प्रमुख व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.  या मालिकेत लगीन घाई बघायला मिळत आहे. राया आणि कृष्णा यांची लग्नघटिका समीप आली आहे. राया आणि कृष्णा  यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

एकमेकांना आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराच्या रूपात बघत नसले तरी पण रायाच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे त्याची पहिली बायको ही अल्पायुषी असेल असं भाकीत गुरुजींनी केलं आहे. त्यामुळे मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि गुली मावशी राया आणि कृष्णाचं लग्न लावण्यासाठी मामाला भरीस पाडतेय. मामाला गुरुजींच्या भाकिताबद्दल कळलं आहे आणि ते हे भाऊसाहेबांना, अंतराच्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. पण गुली मावशीमुळे त्याचे प्रयत्न फसतात. 

गुली मावशी मामाला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढते. कृष्णाला वचनात बांधून टाकते. गुली मावशीच्या षडयंत्रानुसार अंतरा लग्नाच्या मांडवातून गायब झाल्याने भाऊसाहेबांचा अपमान होताना पाहून कृष्णा रायाशी लग्न करण्यासाठी तयार होते. राया आणि कृष्णा हे दोघं पण या लग्नामुळे खुश आहेत का? ते दोघं एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करतील का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

आपण आजवर कायम पाहत आलो आहे कि प्रेमाचा रंग हा गुलाबी असतो. पण या मालिकेत प्रेमाचा रंग पिवळा आहे. पिवळा या हा रंग बुद्धीचं, मांगल्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला खूप मान असतो. या मालिकेतील नायक राया याचा हळदीचा कारखाना आहे. त्याच्या कामाचा पसारा खूप मोठा आहे आणि राया स्वभावाने देखील प्रेमाची उधळण करणारा आहे. तो खऱ्या अर्थाने बाजिंद आहे. तसेच मामा मामींकडे राहणारी कृष्णा ही संयमी आणि विचार करून वागणारी आहे. या दोघांची एक प्रेम कहाणी बेधुंद बेभान अशी आहे.