Join us

मेरे साई या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी या कारणामुळे सुप्रिया पिळगांवकर झाल्या होत्या भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 16:54 IST

साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या ...

साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचा उद्देश समस्त प्रेक्षकवर्गात दया आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करणे हा आहे.सध्या सुरू असलेल्या कथानकात सुप्रिया पिळगांवकर आपल्याला सुहासिनी या भूमिकेत दिसत आहेत. सुहासिनी ही एक दुःखी आई आहे, जिने आपला मुलगा गमवला आहे आणि त्यामुळे तिचा देवावरील विश्वास उडाला आहे. त्याचवेळी ती शिर्डीला येते आणि साईंना भेटते. साई तिच्या मनात मानवतेबद्दल पुन्हा विश्वास निर्माण करतात आणि एक मूल दत्तक घेण्याचा तिला सल्ला देतात. या दृश्याचे चित्रीकरण करताना सुप्रिया भावुक झाल्या होत्या. मूल दत्तक घेण्याच्या संपूर्ण दृश्याने त्या भारावून गेल्या होत्या. या दृश्याचे चित्रीकरण करताना देशभरातील अनाथ मुलांची समस्या त्यांना अधिक जवळून जाणवली असे तिचे म्हणणे आहे. याविषयी सुप्रिया पिळगांवकर यांनी सांगितले की, “सुहासिनी एक मूल दत्तक घेते असा जो प्रसंग सध्याच्या कथानकात सुरू आहे, तो करताना मी भावनावश झाले होते. मी या मालिकेत काम करण्याचे स्वीकारले त्यामागील एक मुख्य कारण हेच होते की एकमेकांबद्दल निरंतर दया भाव ठेवण्याचा संदेश या मालिकेतून दिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या दृश्यात असे दाखवले आहे की, माझी व्यक्तिरेखा एक मूल दत्तक घेते. हे दृश्य साकारताना अचानक मला हे जाणवले की, देशात अशी असंख्य अनाथ मुले आहेत ज्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रत्यके मुलाला सुरक्षित आणि आनंदाने भरलेले बालपण मिळावे हा त्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी मी साईंकडे प्रार्थना करते.”मेरे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई बाबांच्या आयुष्यातील अनेक घटना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत साईंची भूमिका अबीर सुफी, झिपरीची भूमिका धृती मंगेशकर साकारत आहे. तसेच तोरल रासपुत्र, वैभव मांगले यांसारखे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. अबीर सूफी, तोरल रासपुत्र आणि वैभव मांगले या मुख्य कलाकारांच्या कलात्मक अभिनयामुळे मालिकेने लोकांची मने जिंकली आहेत.Also Read : सुप्रिया पिळगांवकर आणि वैभव मांगले यांनी १४ वर्षांनंतर एकत्र केले काम