Join us  

भाजी विकणाऱ्या दिग्दर्शकाची बिकट परिस्थिती पाहून 'बालिका वधू'ची टीम सरसावली मदतीला, अनुप सोनीने दिली माहिती

By गीतांजली | Published: September 29, 2020 2:13 PM

कोरोना आणि लॉकडाऊन काळात ते उत्तरप्रदेशातील आपल्या घरी आले आणि तिथेच अडकले.

 लोकप्रिय मालिका बालिका वधूचे दिग्दर्शक रामवृक्ष गौड यांच्या भाजी विकण्याची वेळ आली आहे.  रामवृक्ष सध्या उत्तर प्रदेशातील आपल्या घरी आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात ते उत्तरप्रदेशातील आपल्या घरी आले आणि तिथेच अडकले. मुंबईला परतणे शक्य न झाल्याने आणि गाठचे सगळे पैसे संपल्याने सध्या रामवृक्ष गल्लोगल्ली ठेल्यावर भाजीपाला विकत आहेत.

रामवृक्ष यांचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर आता अनुप सोनीने ट्विटरवर या गोष्टीची माहिती दिली आहे की रामवृक्ष यांची मदत करण्यासाठी त्यांची टीम संपर्क करण्याचा प्रयत्न करते आहे. अनुपने लिहिले,  ही खूप वाईट गोष्ट आहे. आमच्या 'बालिका वधू' टीमला याविषयी माहिती मिळाली आणि मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे.'

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार अनुप सोनी पुढे म्हणाला, बरेच लोक त्याच्याबद्दल माहित नव्हते कारण तो दुसऱ्या युनिटचे दिग्दर्शक होते. बालिका वधू' च्या टीमकडून मला कळले की ते रामवृक्ष यांच्या बँक खात्याचा तपशील मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रामवृक्षाचे मुंबईत एक घर आहे आणि ते खूप स्वभिमानी व्यक्ती आहेत. टीम त्यांच्याशी बोलते आहे आणि असा निर्णय घेण्यात आला आहे की, जसे रामवृक्ष यांच्या बँक अकाऊंटचे डिटेल्स मिळतील, तसे त्यांना मदत केली जाईल. 

रामवृक्ष यांनी 25 हून अधिक मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. बालिका वधू, ज्योती, कुछ तो लोग कहेंगे, सुजाता सारख्या अनेक मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. गेल्या 22 वर्षांपासून ते याच क्षेत्रात आहेत.

टॅग्स :अनुप सोनी