Join us  

'सावली होईन सुखाची'मध्ये नवं वळण; गौरी खरंच जिवंत असेल की रुद्राला होतोय तिचा भास?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 7:36 PM

'सावली होईन सुखाची' (Sawali Hoin Sukhachi) मालिकेत अनपेक्षित वळण येणार आहे. गौरी आणि बिट्टीच्या आत्महत्येमुळे रुद्राच्या मनावर पुन्हा आघात होणार आहे.

'सावली होईन सुखाची' (Sawali Hoin Sukhachi) मालिकेत अनपेक्षित वळण येणार आहे. गौरी आणि बिट्टीच्या आत्महत्येमुळे रुद्राच्या मनावर पुन्हा आघात होणार आहे. नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे आणि अचानक आयुष्य कोणत्या वळणावर येऊन अडकणार याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. अशाचप्रकारे एक मोठं संकट 'सावली होईन सुखाची' या मालिकेतील रुद्रा, गौरी आणि बिट्टी यांच्या आयुष्यात आलं आहे.

'सावली होईन सुखाची' या मालिकेत आता मोठा ट्विस्ट घडणार आहे. मालिकेची कथा काही महिने पुढे सरकली आहे. गौरी आणि बिट्टी यांचं नेमकं काय नातं आहे याचा खुलासा झाला असून रुद्राला खरं कळलं आहे की गौरी आणि बिट्टी या नात्याने खऱ्या माय लेकी नाहीत. या कारणास्तव गौरी आणि बिट्टी यांना घरातून काढून टाकले जाते. हे दुःख त्या दोघींनी कसं पचवलं असेल...? या प्रसंगानंतर गौरी आणि बिट्टी यांनी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची बातमी रुद्राच्या कानावर येते आणि हे ऐकून रुद्राच्या पायाखालची जमीन सरकते. 

गौरी आणि बिट्टीच्या मृत्यूची घटना सहन करू न शकलेला आणि अपराधीपणाची भावना घेऊन फिरणारा रुद्रा पुन्हा एकदा अती मद्यापानाच्या मार्गाला लागतो. या आघातामुळे तो पुन्हा एकदा व्यवसायातील रस, इच्छा गमावतो आणि दिवाळखोर बनतो. पैशांची वसुली करणारी माणसं त्यांच्या पाठी लागली आहेत, एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमुळे त्याचा त्याच्या आयुष्यावर ताबा राहिलेला नाही.

रुद्राच्या आयुष्यातील हा टप्पा कोणतं नवं वळण घेणार याकडे प्रेक्षकांचं नक्कीच लक्ष असेल. सध्याची रुद्राची परिस्थिती पाहता त्याचा पूर्ण वेगळा लूक आता पाहायला मिळणार आहे. दारूच्या आहारी गेलेला रूद्रा दारूच्या नशेत सतत गौरी आणि बिट्टीशी बोलत असतो. दोघींच्या आठवणीत हरवून गेलेल्या रूद्राला एके दिवशी एका दुकानातील अगरबत्तीच्या वासाने गौरी जिवंत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.  खरंच गौरी जिवंत असेल का? की गौरी सारखं कोणी दुसरं असेल? आणि जर ही आपलीच गौरी असेल तर तिची गौरी म्हणून नवीन अवतारात एन्ट्री होणार की आहे तीच गौरी तिच्या अंदाजात आपल्या समोर येणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील, या प्रश्नांचं अचूक उत्तर जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.