Join us  

Mitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 4:51 PM

‘मित्रों’ हा चित्रपट ‘पेली चोपुलू’ या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘फिल्मिस्तान’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे नितीन कक्कर यांच्या दिग्दर्शनाखाली  गुजरातच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे.

Release Date: September 14, 2018Language: हिंदी
Cast:  जॅकी भगनानी, कृतिका कामरा, प्रतिक गांधी, शिवम पारेख, प्रतिक बब्बर
Producer: विकास मल्होत्राDirector: नितीन कक्कर
Duration: 2 तास 20 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

-श्वेता पांडे

मित्रों’ हा चित्रपट ‘पेली चोपुलू’ या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘फिल्मिस्तान’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे नितीन कक्कर यांच्या दिग्दर्शनाखाली  गुजरातच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे.

चित्रपटाची कथा जय (जॅकी भगनानी) या मुख्य पात्राभोवती फिरते. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम कसाबसा पूर्ण करणा-या जयला आयुष्यात काय करायचे, हे अद्यापही ठाऊक नसते. जयचा हाच स्वभाव त्याच्या वडिलांना खटकत असतो. जयला त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हावी,यासाठी त्यांना एकच मार्ग सुचतो आणि तो म्हणजे, जयचे लग्न. लगेच जयच्या लग्नाची तयारी सुरू होते. जयच्या लग्नासाठी एक स्थळ येते आणि जय आपल्या कुटुंबासोबत मुलगी पाहायला तिच्या घरी पोहोचतो. येथे जयची ओळख होते ती अवनीसोबत (कृतिका कामरा). अवनी एक महत्त्वाकांक्षी मुलगी असते. आयुष्यात काय करायचे, हे तिला पक्के ठाऊक असते. जय आणि अवनी पहिल्याच भेटीत आपल्या भूतकाळावर बोलतात. बोलता बोलता अवनी तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड विक्रमबद्दलही (प्रतिक बब्बर) सांगते. विक्रमसोबत मिळून मी एक फूड ट्रक सुरू करणार होती. पण विक्रमने हुंड्यासाठी एका श्रीमंत मुलीशी लग्न केले आणि फूड ट्रक सुरू करण्याचे आपले स्वप्न अधूरे राहिले, हा सगळा इतिहासही ती जयला ऐकवते. जयसुद्धा अवनीपासून काहीही लपवत नाही. आता अवनी व जय एकमेकांसोबत लग्न करणार, असे वाटत असतानांच या कथेत ट्विस्ट येतो. तो म्हणजे, आपण चुकीच्या पत्त्यावर मुलगी पाहायला आलोय, हे जयच्या कुटुंबाला कळते. म्हणजे, जयसाठी आलेले स्थळ अवनीचे नसते तर एका श्रीमंत मुलीचे असते. अशाप्रकारे कथा पुढे सरकते आणि मग ‘ट्विस्ट अ‍ॅण्ड टर्न’सोबत दोघेही फूड ट्रक सुरू करतात. अनेक अडचणींवर मात करून अवनी व जयचा बिझनेस रूळावर येतो. पण यादरम्यान दोघांत प्रेम बहरते की दोघेही केवळ बिझनेस पार्टनर बनून राहतात, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहातचं जावे लागेल.

सर्वातआधी बोलू या कथेबद्दल. चित्रपटाची पटकथा चांगली आहे. पण तिची मांडणी मात्र अगदीचं जेमतेम आहे. चित्रत्रपटातील ‘फ्लॅश बॅक सीन्स’ उत्तम जमून आलेत. हा एक वेगळा  प्रयोग आहे. त्यामुळेचं मजेशीर आहे. चित्रपटाचा वेग फारच संथ आहे. विशेषत: दुस-या भागात चित्रपट आणखीच रेंगाळतो. अभिनयाबद्दल सांगायचे तर जॅकी भगनानी तीन वर्षांनंतर पडद्यावर परतला आहे. त्याने आपल्यातील १०० टक्के देण्याचा प्रयत्न केलाय. कृतिकाही अख्ख्या चित्रपटात आत्मविश्वासाने वावरली आहे. प्रतिक बब्बरची काही मिनिटांची भूमिकाही ठीक-ठीक आहे. प्रतिक गांधीने मात्र या सगळ्या कलाकारांमध्ये सर्वोत्तम अभिनय केला आहे. रौनकच्या भूमिकेत त्याने अक्षरश: जीव ओतला आहे. त्याचे एका ओळीचे संवाद तुम्हाला चित्रपटगृहाबाहेरही आठवत राहतील. चित्रपटाचे संगीतही कथेनुरूप आहे. एकंदर काय तर एक कुटुंबासोबत बघता येईल असा हा हलकाफुलका सिनेमा आहे. एकदा बघायला हरकत नाही.  

टॅग्स :मित्रों