Join us

निर्मात्यांनी प्रोफेशनल व्हावे

By admin | Updated: March 11, 2016 02:13 IST

‘पोस्टर गर्ल, फक्त लढ म्हणा, आंधळी कोशिंबीर, नो एन्ट्री पुढे धोका आहे, पोस्टर बॉइज’ यासारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनय साकारून अनिकेत विश्वासरावने

‘पोस्टर गर्ल, फक्त लढ म्हणा, आंधळी कोशिंबीर, नो एन्ट्री पुढे धोका आहे, पोस्टर बॉइज’ यासारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनय साकारून अनिकेत विश्वासरावने मराठी चित्रपटसृष्टीत कमी वेळेत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. सुधीर मिश्रा यांच्या ‘चमेली’ या चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या या अभिनेत्याने पाहता-पाहता रसिक प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची मोहर उमटवली. तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला चॉकलेट बॉय म्हणजेच, अनिकेत विश्वासराव मराठी इंडस्ट्रीमध्ये काय बदल घडायला हवेत, यावर सेलिब्रिटी रिर्पोटरच्या माध्यमातून संवाद साधत आहे.आजकाल निर्माते केवळ हौस म्हणून चित्रपट बनवत आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान होत आहे. चित्रपटांमध्ये वेगवेगळे चांगले विषय येण्याची गरज आहे. त्यामुळे फक्त आवड म्हणून चित्रपट काढणे आणि त्याच दृष्टीने सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्मात्यांनी बदलायला पाहिजे. चित्रपटाकडे केवळ मनी मेकिंग बिझनेस म्हणून न पाहता प्रोफेशनली पाहायला पाहिजे.कोणताही सिनेमा चांगला दर्जेदार असणे गरजेचे असते. चांगल्या चित्रपटांना सपोर्ट करण्याची गरज आहे. सिनेमाच्या बजेटपेक्षा सिनेमाची कुवत पाहिली पाहिजे. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट या चित्रपटांनी हे सिद्ध केले आहे. प्रेक्षकांनीही चांगल्या चित्रपटांना अ‍ॅप्रिसिएट केले पाहिजे.कलाकार चित्रपटांमध्ये काम करताना अतिशय मेहनत घेतात. जीव ओतून अभिनय करतात. अनेकदा चित्रपट डब्यात जातो. काही वेळा खूप काळानंतर येतो, तर कधी-कधी अनेक चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवून जातो. एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात आणि जातातही. त्यांचा फारसा इम्पॅक्ट राहत नाहीत. त्यामुळे निर्मात्यांनी प्रत्येक चित्रपट हा माझा सिनेमा म्हणूनच पाहिला पाहिजे. त्यांनी प्रोफेशनल अ‍ॅप्रोच ठेवला पाहिजे.चित्रपटाची निर्मिती करताना त्यामागे असंख्य जणांचे हात लागलेले असतात. त्यामुळे तो चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सर्व गोष्टींचे योग्य रीतीने प्लॅनिंग करण्याची आवश्यकता असते. सध्या सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन. निर्मात्यांनी योग्य रीतीने सर्व माध्यमांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले, तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यासाठी स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याची आवश्यकता असते. कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील वेळ देतात, परंतु वेळेत प्रमोशन सुरू झाले नाही, तर कलाकारांच्या पुढील सिनेमाच्या तारखा त्या वेळी क्लॅश होतात. या वेळी कलाकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.बॉलीवूडकडून मराठी चित्रपटसृष्टीने कामाचे नियोजन कसे करायचे, हे शिकले पाहिजे. निर्मात्यांनी चित्रपटांना ३०-४० लाख रुपये अनुदान मिळते म्हणून सिनेमा बनवणे, हे कितपत योग्य आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. निर्मात्यांनी पैसा खर्च केला, तर नक्कीच चांगला चित्रपट बनू शकेल. ६० ते ८० लाख रुपयांमध्ये आता चित्रपट बनत नाहीत. जास्त पैसा खर्च न करणाऱ्या निर्मात्यांनी रिटर्न येणाऱ्या पैशांची अपेक्षा करू नये. खरेदी करताना जे प्रॉडक्ट चांगले आहे, ते आपण खरेदी करतो, त्याचप्रमाणे एखाद्या कलाकाराला चांगलेच काम करावे लागते. आपले प्रेक्षक हे सुजाण आहेत. त्यांना आपण गंडवू शकत नाहीत.